कोपरगाव -राज्यातील ठराविक तालुके दुष्काळ यादीत समावेश झाल्यानंतर कोपरगाव मतदारसंघात मोठा असंतोष नागरिक व्यक्त करू लागले होते. त्या पार्श्वभूमीवर मा.आ.स्नेहलता कोल्हे आणि कोल्हे कारखान्याचे चेअरमने विवेक कोल्हे यांनी सातत्याने मागणी करून शासनाला आग्रह धरला होता. आजअखेर 9 नोव्हेंबर रोजी कोपरगाव मतदारसंघातील कोपरगाव, रवंदे, सुरेगाव,पोहेगाव, दहेगाव बोलका, पुणतांबा या सात मंडलांचा समावेश दुष्काळ सवलती लागू करण्याच्या दृष्टीने निर्णय झाल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिल्यानंतर कोल्हे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यासह शासनाचे आभार मानले आहेत.
चालू हंगामात पाऊस कमी पडल्याने शेतकरी राजा संकटात होता. त्यामुळे अतिशय खडतर परिस्थिती शेती क्षेत्रावर आली होती. या वेळेत इतर तालुके दुष्काळ यादीत बसतात. मात्र, कोपरगाव तालुका या दुष्काळ यादीत का नाही, यासाठी पाठपुरावा करून जनरेटा कोल्हे यांनी शासन स्तरावर धरला असताना त्यावर सकारात्मक निर्णय झाला असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
माझ्या मतदारसंघात शेतकरी राजा संकटात असताना भविष्यात दुष्काळ टंचाईला सामोरे जाण्यासाठी काय उपयोजना करता येतील या विवंचनेत आपण असताना शासनाने मागणीची दखल घेऊन सकारात्मक निर्णय घेतला,त्याबद्दल शासनाचे धन्यवाद.
स्नेहलता कोल्हे, माजी आमदार