पवन मावळ (नीलेश ठाकर) – दिपोत्सवात फुलांमुळे उत्साह द्विगुणित होते. दसऱ्याच्यावेळी झेंडूला कवडीमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चही निघाला नव्हता. सध्या शेतकऱ्यांच्या फुलांना बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने त्यांची दिवाळी उत्साहात जाण्याची शक्यता आहे. अष्टर फुलालाही दोनशे रुपये भाव किरकोळ बाजारात मिळत आहे.
लग्न समारंभ असो की धार्मिक पूजाविधी अथवा कुठला सण-उत्सव, यासाठी फुलांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते. मावळ तालुका हा फूल उत्पादक म्हणून ओळखला जातो. पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवडपासून मध्यवर्ती भागात हा परिसर असल्याने ही शहरे महत्त्वाची बाजारपेठ आहेत. या बाजारपेठेमध्ये दिवसाला लाखोंची उलाढाल होत असून शेतकरी ते किरकोळ फूल विक्रेत्यांसाठी या बाजारपेठेचे महत्त्व आहे.
दिवाळीच्या तोंडावर झेंडूच्या फुलांची आवक वाढली आहे. ग्रामीण भागात कृत्रिम फुलांचा वापर कमी होतो. त्यामुळे झेंडूच्या फुलाने सजावट केली जाते. शहरातील कृत्रिम फुलांचे फॅड वाढले असले तरी पूजेसाठी मात्र, झेंडूची आणि इतर फुलांचाच वापर केला जातो. त्यामुळे दिवाळीत या फूलविक्रीतून शेतकऱ्यांना चांगल्या कमाईची आशा आहे.
फुलांच्या दरात वाढ
यावर्षी मावळ तालुक्यातील पवन मावळ, आंदर मावळ आणि नाणे मावळ येथे असलेल्या शेतांमध्ये फुलांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात वाढते तापमान आणि दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने फूल उत्पादक शेतकऱ्यांची मोठी हानी केली आहे. त्यामुळे फुलांची मागणी जरी अधिक असली तरी आवक कमी झाली आहे. पर्यायी फुलांच्या दरामध्ये वाढ झाली आहे. झेंडू जो दसऱ्याच्या वेळी 1.-20 रुपयांना होता. आता त्याच झेंडूला 50-60 रुपये भाव मिळत आहे. मोगरा 200-300 रुपये किलोवरून आत्ता 400-500 रुपयांवर गेला आहे. यासह इतर फुलांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
दिवाळीतच फुलांना मागणी
दिवाळीमध्ये घर सजविण्यासाठी झेंडूच्या फुलांना मागणी असते. यावर्षी दोन दिवसांत या फुलांना आणखी चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे. मावळ तालुका पुणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड शहराजवळ असल्याने विक्रीसाठी बराच वाव आहे. त्यामुळे ग्रामीणपेक्षा शहरात फुलांचा चांगला भाव मिळतो.
कृत्रिम फुलांमुळे शेतकरी नाराज
या कृत्रिम फुलांचा फटका नैसर्गिक फुलांच्या व्यवसायाला बसत आहे. फुलांची मागणी कमी होत असल्याने फुलांचा शेतकरीही अडचणीत सापडत आहे. बहुतांश फुले हे केवळ सजावट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. मात्र अलीकडच्या काळात कृत्रिम फुलांचे चलन वाढल्याने त्याचा विक्रीवर परिणाम झाल्याचे मत फूल विक्रेते आणि फूल उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.