पिंपरी – आंद्रा प्रकल्पाचे पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही महिन्यांमध्ये हा प्रकल्प सुरू होणार आहे. परंतु या जलशुद्धीकरण केंद्राचे पाणी चिखलीवासीयांना मिळणार की नाही यावरून राष्ट्रवादी आणि भाजपात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. त्यामुळे चिखलीतील पाणी प्रश्न पेटला आहे.
मागील तीन वर्षांपासून पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नागरिक पाणी प्रश्नावर त्रस्त आहेत. एक दिवसाआड पाणी सुरू आहे. त्यामुळे कधी एकदाचा हा पाणी प्रश्न सुटेल असे झाले आहे. परंतु आंद्रा प्रकल्पातील पाणी चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच सामाजिक कार्यकर्ते विकास साने यांनी दोन दिवसांपूर्वी जलशुद्धीकरण केंद्रावर फेसबूक लाइव्ह करीत प्रशासन आणि सत्ताधारी नेत्यांवर टीका केली. चिखलीतील सुमारे 20 एकर जागा प्रकल्पाला दिली असताना, या प्रकल्पातून चिखलीत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही, असा आरोपही केला. त्यामुळे चिखलीकर जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यादरम्यान, प्रभागातील भाजपाचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड, सुरेश म्हेत्रे आणि सामाजिक कार्यकर्ते विनायक मोरे, माजी स्वीकृत नगरसदस्य दिनेश यादव, संतोष मोरे, अंकुश मळेकर यांनी जलशुद्धीकरण केंद्रावरून सोशल मीडियाच्या माध्यमातून चिखलीकरांशी संवाद साधला. या वेळी महापालिका पाणीपुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी रामनाथ टकले, चंद्रकांत मुठाळे, संजय जाधव उपस्थित होते.
चिखली जलशुद्धीकरण केंद्रातून संपूर्ण शहरातील नागरिकांना पाणी मिळणार आहे. चिखलीतील नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवणार हा दावा निव्वळ दिशाभूल करणारा आहे. समाविष्ट गावांतील पाणी पुरवठा सुरळीत होण्यासाठी आमदार महेश लांडगे यांनी हा प्रकल्प हाती घेतला. या प्रकल्पामुळे चिखली, डुडुळगाव, मोशी, चऱ्होली भागातील पाणीपुरवठा सक्षम होण्यास मदत
होणार आहे.
– कुंदन गायकवाड, माजी नगरसेवक.
सर्व शहरासाठी होणार पाणीपुरवठा
समाविष्ट गावांना 20 वर्षे पायाभूत सुविधांसाठी प्रतीक्षा करावी लागली. आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून संतपीठ, जलशुद्धीकरण प्रकल्प, बहुउद्देशील सभागृह यांसह महत्त्वाकांक्षी प्रकल्प चिखली आणि समाविष्ट गावांमध्ये आणले. त्यामुळे समाविष्ट गावांतील नागरिकांची जीवनमान उंचावले आहे. त्यामुळे नागरिकांनी राजकीय हेतून केलेल्या भूलथापांना बळी पडू नये.
– दिनेश यादव, माजी स्वीकृत नगरसदस्य.
चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी महापालिका हद्दीतील सर्व भागांसाठी मिळणार आहे. चिखलीसाठी मिळणार नाही हा गैरसमज आहे. ज्या भागात पाणी कमी पडेल त्या भागाला येथून पुरवठा करण्यात येणार आहे.
– अजय सूर्यवंशी, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग
चिखली गावाची 20 एकर जमीन या जलशुद्धीकरण प्रकल्पासाठी देण्यात आली आहे. परंतु या जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आदी परिसरासाठी देण्यात येणार आहे. परंतु चिखलीकरांना पाण्यापासून वंचित रहावे लागणार आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्राच्या आऊटलेट पाइपलाइनला चिखलीसाठी स्वतंत्र लाइन टाकून पाण्याची टाकी भरण्याची व्यवस्था केल्यास चिखलीला पाण्याचा तुटवडा पडणार नाही. परंतु महापालिका प्रशासन तसे करण्यास तयार नाही. त्यामुळे चिखलीत जलशुद्धीकरण प्रकल्प असून देखील चिखलीकरांची पाण्यासाठी वणवण कायम राहणार आहे. गावाचं हित पहा; राजकारण करू नका.
– विकास साने, सामाजिक कार्यकर्ते.