मुंबई – देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यात माजी मंत्री गिरीश महाजन आणि रश्मि शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे केलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचाही समावेश आहे. या प्रकरणात फडणवीस यांचा जबाब या आधीच नोंदवून घेण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने राज्याच्या पोलिस दलामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.
भाजपचे माजीमंत्री गिरीश महाजन यांच्यावर खंडणी आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या धमकीचा आरोप आहे. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर 2019 मध्ये फडणवीस सरकारच्या काळात राजकीय नेत्यांचे बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात रितसर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्याआधी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी त्यांच्या चौकशी अहवालात रश्मी शुक्ला यांनी गोपनीय अहवाल लीक केल्याचा आरोप केला होता.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या आदेशाने हे प्रकरण नुकतेच दक्षिण मुंबईतील कुलाबा पोलीस ठाण्यात पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले होते.आता, गेल्या महिन्यात राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी तपास सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश जारी केले आहेत.