हाथरस – हरिद्वारहून भोपाळला जात असलेल्या कावड यात्रेकरूंच्या गटातील सहा जणांना उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात पहाटे एका भरधाव ट्रकने चिरडले. त्यात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका जखमीचे रूग्णालयात निधन झाले.
ही घटना आज पहाटे 2:15 वाजता घडली. कावड घेऊन जाणाऱ्या यात्रेकरूंचा हा जत्था सात जणांचा होता. त्यावर भरधाव वेगाने जाणारा ट्रक घुसल्याने हा अपघात झाला. ट्रक चालक पळून गेला असला तरी त्याची माहिती मिळाली असून त्याचा शोध घेतला जात आहे असे पोलिसांनी सांगितले.
ही कावड यात्रा भगवान शिवाच्या भक्तांद्वारे दरवर्षी काढली जाते. त्यात सहभागी होणाऱ्यांना कंवरिया म्हणून संबोधले जाते. हे भक्त उत्तराखंडमधील हरिद्वार, गायमुख आणि गंगोत्री आणि बिहारमधील सुलतानगंज या ठिकाणी गंगेचे पवित्र पाणी आणण्यासाठी जातात आणि नंतर देवाची पूजा करतात.
कोविड-19 निर्बंधांमुळे दोन वर्षांच्या अंतरानंतर या वर्षी कावड यात्रा पुन्हा सुरू झाली आहे. पवित्र यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अनेक भागातील प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करत आहेत.