आ. जयकुमार गोरेंच्या अधिकाऱ्यांना सूचना; गैरहजर कृषी अधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती
सातारा (प्रतिनिधी) –माण आणि खटाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे, फळबागांचे आणि अनेकांच्या जंगम मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी कागदी घोडे नाचवायचे बंद करुन दोन्ही तालुक्यात सरसकट पंचनामे करावेत अशा सूचना आ. जयकुमार गोरे यांनी दिल्या. महत्वाच्या बैठकीला गैरहजर असणाऱ्या कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी प्रांतांना दिल्या. दुचाकीवर तसेच चिखलातून चालत मार्ग काढत त्यांनी शेतीपिकांच्या नुकसानीची पाहणीही केली. दहिवडीतील विश्रामगृहावर आयोजित बैठकीला प्रांत अश्विनी जिरंगे, तहसीलदार बाई माने, कृषी आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आ. जयकुमार गोरे म्हणाले, कायम दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या माण आणि खटाव तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. खरिपाची पिके अतिवृष्टीमुळे वाया गेली आहेत.
अद्यापही पाऊस पडत असल्याने रब्बी हंगामाच्या पेरण्या झाल्या नाहीत. कांदा, बाजरी, मका, बटाटा, आले पिकासह कडधान्यांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजाचे कंबरडे मोडले आहे. जीवापाड परिश्रम करुन जगविलेल्या अनेक फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी जंगम मालमत्तांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता वेळ न दवडता दोन दिवसात झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करावेत.
पंचनामा करणाऱ्या एजन्सीज व्यवस्थित काम करणार नाहीत. त्यांचा मेळही बसणार नाही. सर्व ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश द्या. प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रांत आणि तहसीलदारांनी द्यावेत. या कामी दोन्ही अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालावे अशा सूचनाही आ. गोरे यांनी दिल्या. गोरे यांनी माण तालुक्यातील दिवडसह विविध गावांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणी पाण्यात कुजलेली विविध पिके आणि फळबागांचे झालेले नुकसान अधिकाऱ्यांना दाखवून सरसकट पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले.
…तर गाठ माझ्याशी आहे
भाजपच्या पक्ष बैठकीला मुंबईत हजेरी लावण्यापूर्वीच आ. जयकुमार गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पंचानामे करण्याविषयी निवेदन दिले होते. मुंबईतून आल्यावर लगेच त्यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सरसकट पंचनाम्याच्या सूचना दिल्या. स्वतः शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. मुख्यमंत्र्यांनी तर मोबाइलच्या फोटोवरुनही शेतकऱ्यांना भरपाई देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पंचनामे करताना चालढकल केली तर गाठ माझ्याशी आहे, अशी तंबी आ. गोरेंनी दिली.