शिवसेनेचे तालुकाप्रमुख काळभोर यांची मागणी
लोणी काळभोर – हवेली तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने भाजीपाल्याच्याचे प्रचंड नुकसान झाल्यामुळे राज्य सरकारने कुठलेही नियम व अटी न लावता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे हवेली तालुकाप्रमुख प्रशांत काळभोर यांनी केली आहे.
काळभोर म्हणाले की, हवेली तालुक्याच्या पूर्व भागात भाजीपाल्याच्याचे नुकसान झालेले आहे. मका, कडवळ आदी चारा पिकांसह गुलाब, गुलछडीसारखी फूले कांदा, बाजरी, कोबी, फ्लॉवर, पेरू, वांगी, गवार, भेंडी, काकडी, कारली, दोडका, भोपळा, टॉमेटो कांदा पात यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे आर्थिक फटका बसला आहे.
बाजरीही धोक्यात आली आहे. पाऊस थांबल्यावर पुढील पिकांसाठी जमीन तयार करावी लागणार आहे. सातबाऱ्यावर पहिल्याच कर्जाचा बोजा असल्याने त्याला नवीन कर्ज मिळणार नाही. नवीन पीक करण्यासाठी ट्रॅक्टर, बी, औषधे, खते याबरोबरच घरखर्च चालवण्यासाठी त्याला पैशांची गरज लागणार आहे. त्यामुळे भरपाई द्यावी.
शेतकरी उपाशी, ग्राहक भरडले –
सततच्या पावसामुळे भाजीपाल्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ग्राहकांना कमी प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होत आहे. कमी दर्जाचा भाजीपाला खावा लागत आहे. मात्र, याचे भाव मात्र अक्षरशः गगनाला भिडले आहेत. शनिवारी आठवडे बाजारात कोथींबीरीची गड्डी 70 रुपयांना तर मेथीची गड्डी 40 ते 50 रुपयांना विकली गेली. भाववाढीमुळे सर्वसामान्य गृहिणींचे आठवडा बाजाराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.