नारायणगाव -जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात पुणे, मुंबई आणि अन्य शहरातून आपल्या गावी आलेल्या लोकांची संख्या सुमारे 55 हजारांहून अधिक आहे.
ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर होऊ नये, म्हणून गावी आलेल्या लोकांनी आपले कुटुंबीय आपल्या लोकांसाठी घरच्या घरी होम क्वारंटाइन व्हावे, सर्व प्रशासन यंत्रणा, पोलीस व आरोग्य विभागाला सहकार्य करा, असे आवाहन माजी खासदार आणि शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख, उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले.
नारायणगाव येथील एसटी बस स्थानकालगत असणाऱ्या पोलीस मदत केंद्राला भेट देऊन पोलिसांच्या कामाचे त्यांनी कौतुक केले. यावेळी माजी आमदार शरद सोनवणे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, जगात 5 लाख 35 लोक करोनाचे बाधित आहे. हा आकडा वाढू नये म्हणून सर्व देशांमध्ये लॉकडाऊन केल्याने करोनाची परिस्थिती आटोक्यात येत आहे. गावी आलेल्या लोकांनी होम क्वारंटाइन करणे गरजेचे आहे. शिरूर तालुक्यात करोनाचा एक रुग्ण मिळून आला आहे. अत्यावश्यक सुविधा व्यतिरिक्त कोणीही बाहेर पडू नये.