ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नागरिकांची होतेयं गैरसोय
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू येथे पाणीपुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागला. देशात सर्वत्र संचारबंदी आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन नागरिकांना सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सूचना करत आहे. परंतु देहूगावात पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी गर्दी होत आहे.
तीर्थक्षेत्र देहू येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) यांच्याकडून पाणीपुरवठा होत होता. आठ महिन्यांपूर्वी एमजीपीने देहू ग्रामपंचायतीकडे पाणीपुरवठा योजना हस्तांतरित केली आहे. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा केला जात आहे. हा पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.
गेल्या चार दिवसांपासून विविध भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. वडाचा माळ, चव्हाणनगर, गावठाण परिसर, देहू-आळंदी मार्ग, ओंकार, ओमकार, निर्सग, सह्याद्री सोसायटी, विठ्ठलवाडी परिसरात गेली चार-पाच दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. वडाचा माळ येथे योगेश मोरे यांच्याकडून दोन पाण्याचे टॅंकर नागरिकांसाठी शुक्रवारी (दि. 27) दुपारी पाठवण्यात आले होते.
एकीकडे करोना संसर्गजन्य असणाऱ्या व्हायरसमुळे नागरिकांच्या होणाऱ्या गर्दीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने संचारबंदी जाहीर केली. लॉकडाऊन केले. परंतु पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने संचारबंदीच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडू नका असे वारंवार सांगितले जात आहे. परंतु पाण्यासाठी देहूवासीयांना घराबाहेर पडण्याची वेळ स्थानिक प्रशासनाने आणली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये ग्रामपंचायत प्रशासनाविषयी नाराजी निर्माण झाली आहे.
अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने, व्यवसाय बंद करण्यात आली आहेत. ग्रामपंचायतचे सरपंच पूनम काळोखे यांनी गावामध्ये प्रवेश बंदी केली असून, प्रशासनाकडून ठिकठिकाणी सोडियम हायड्रोक्लोराईड औषधाची फवारणी करण्यात येत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून जनजागृती करण्यात येत आहे. परंतु तेच ग्रामप्रशान नागरिकांना टॅंकरने पाणीपुरवठा करताना करोना विषाणूची बाधा यांना होईल हे विसरून गेली की काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. या सर्व गोष्टींकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
इंद्रायणी नदीपात्रात पाणी कमी झाले आहे. उपसा होत असणाऱ्या जलउपसा केंद्रांवर पाण्याची कमतरता झाल्याने पाणी संकलन करताना वेळ लागत आहे. पाणी साठा झाल्यानंतर पाणी सोडण्यात येईल. फक्त 48 तासांपासून काही ठिकाणी पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. शनिवारपासून पाणीसाठ्यानुसार पाणीपुरवठा करण्यात येईल.
– अर्जुन गुडसुरकर, ग्राम विकास अधिकारी
प्रथम दिलगिरी व्यक्त करते. कारण गेले दोन दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नाही. काही तांत्रिक अडचणींमुळे पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परंतु काळजी करू नका. लवकरच ही समस्या सोडवून सुरळीत व पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येईल.
पूनम काळोखे, सरपंच