Supriya Sule: राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)च्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात सुरु असणाऱ्या विविध आंदोलनांवरून बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजस्थान दौऱ्यावरून सरकारला घेरले.
राज्य सरकारवर निशाणा साधताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी, “महाराष्ट्रात अनेक समाज विविध मुद्द्यांवर आंदोलन करत आहेत, परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राजस्थानमध्ये प्रचारात व्यस्त आहेत, जिथे या वर्षाच्या शेवटी विधानसभा निवडणुका होणार आहेत. एकनाथ शिंदे सरकार स्वार्थासाठी स्थापन झाले असून त्यांना जनतेची पर्वा नाही, असा आरोप त्यांनी केला.
पुढे बोलताना सुळे, “राज्यात आज मराठा असो, धनगर असो, लिंगायत असो वा मुस्लिम, सर्वांचीच अस्वस्थता आहे. मात्र, उपमुख्यमंत्री फडणवीस दुसऱ्या राज्यात प्रचारात व्यस्त आहेत, यावरून या सरकारचा दृष्टिकोन दिसून येतो, असा दावा त्यांनी केला.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी, ‘मोदी है तो मुमकिन है’ असा दावा करणाऱ्या भाजपने (भारतीय जनता पक्ष) या समाजांच्या आरक्षणाबाबत संसदेत चर्चा करावी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण पाठिंबा देईल,” असे म्हटले. तसेच नोकऱ्यांचे खाजगीकरण आणि कंत्राटी पद्धती लागू करण्याच्या सरकारच्या निर्णयावर त्यांनी यावेळी सडकून टीका केली.
राज्य सरकारच्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचे एक महागडे प्रचार अभियान असे वर्णन सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केले. एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी सातारा येथील हिंसाचाराच्या राज्याच्या गृहमंत्रालयाच्या गुप्तचर माहितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.