मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेतली. नाशिकचा नियोजित दौरा रद्द करून त्यांनी ही तातडीची बैठक बोलावली होती. आज मुंबईतील यशवंतराच चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक पार पडली. दरम्यान, पवारांनी “सरकार पाच वर्ष टिकवायचं आहे, मुख्यमंत्र्यांशी योग्य समन्वय ठेवा. वादग्रस्त वक्तव्ये टाळा”, अश्या सूचना राष्ट्रवादीच्या नेत्यांना केल्या.
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, जयंत पाटील, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, नवाब मलिक, यांच्यासह 16 मंत्री उपस्थित होते.
बैठकीनंतर पत्रकारांसोबत संवाद साधताना नवाब मलिक म्हणाले, एनपीआरसाठी जे डाटा कलेक्शन झालेले आहे ते ‘आधार’च्या माध्यमातून झालेले नाही. त्यासाठी करण्यात आलेल्या जनगणनेत काही अतिरीक्त प्रश्नावली केंद्र सरकारने टाकलेली आहे. याबाबत इतर राज्यांनी काय भूमिका घेतलेली आहे, ते महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार तपासून पाहिलं. मात्र जनगणनेचा कार्यक्रम ठरलेला असून त्यासाठी नेमकी काय प्रश्नावली टाकायची याबाबत अद्याप काहीच निर्णय झालेला नाही.
जयंत पाटील म्हणाले शरद पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत महाविकासआघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. पवार साहेबांनी सर्व मंत्र्यांना कामकाजाबाबत मार्गदर्शन केले. बैठकीत राज्यातील इतरही महत्त्वाच्या बाबींवर चर्चा झाली
तसेच भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा तपास केंद्र सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला असला तरी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत व्हावी यासाठी सर्वांचा आग्रह आहे. याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन राज्य सरकार पाऊल उचलणार असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले .