पवनानगर, दि. 1 (वार्ताहर)- पवना धरणग्रस्तांना देण्यात येणाऱ्या पर्यायी जमीन वाटप खातेदारांची यादी प्रसिद्ध करण्यात यावी, अशी मागणी संयुक्त समितीच्या वतीने करण्यात आली आहे याबाबत संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले आहे.
संघटनेचे प्रमुख पदाधिकारी तलाठी सर्कल या प्रमुखांनी एकत्रित येऊन खातेदारांच्या यादी मधील दुरुस्त्या केल्या आहेत. खातेदारांच्या हरकती आपल्याकडे उपलब्ध कागदपत्रानुसार पाठपुरावा करूनही अद्याप त्यावर निर्णय आलेला नाही. याबाबत पुनर्वसन अधिकारी तहसीलदार शेळके यांची भेट घेऊन स्पष्ट कल्पना देण्यात आलेले आहे. काही खातेदारांना जमीन वाटप करण्यात आले आहे, त्यांची नावे यादीतून वगळावीत. तर ज्या धरणग्रस्तांची नावे यादीत नाही त्यांची नावे समाविष्ट करावी. याशिवाय विविध कारणांसाठी संपादन केलेल्या खातेदारांची नावे वाटप यादीत नाव समाविष्ट करावी व लवकरात लवकर यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी केली आहे
मावळ तालुक्यांसह औद्योगिक वसाहतींबरोबरच पिंपरी-चिंचवडची तहान भागविण्यासाठी तालुक्यातील नागरिकांच्या जमीन अधिग्रहित करण्यात आल्या. मात्र, पवना धरणग्रस्तांना पर्यायी जमीन देण्याचा पुनर्वसनाचा विषय अनेक वर्षांपासून शासन दरबारी प्रलंबित आहे. हा विषय मार्गी लावण्याची धरणग्रस्तांची आग्रही मागणी आहे. याकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल धरणग्रस्तांमध्ये संताप आहे.
ठोस भूमिका घेण्याची मागणी
महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर अद्याप कोणतीही बैठक धरणग्रस्तांच्या बाबतीत झाली नसल्याने धरणग्रस्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत अनेक त्रुटी आहेत. यामध्ये प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. पुनर्वसनातील दोन- तीन मुद्दे अतिशय किचकट आहेत. याच मुद्यांवर ठोस भूमिका घेणे आवश्यक आहे. त्यानंतरच हा विषय मार्गी लागू शकतो, अशी दबक्या आवाजात चर्चा आहे.