विमा कंपनीकडे तब्बल 95 हजार तक्रारी; जिल्ह्यातील 20 हजार शेतकऱ्यांना मिळाली भरपाई
मुकुंद भालेराव
नगर – जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट झाली आहेत. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. तर दुसरीकडे पीक विमाधारक शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रारींचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. जिल्हाभरातून तब्बल 95 हजार 92 तक्रारी संबंधित विमा कंपनीला मिळाल्या आहेत. त्यानंतर नुकसानग्रस्त पिकांचे सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. मात्र, भरपाई मिळण्यात बराच वेळ जात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील फक्त 20 हजार 226 शेतकऱ्यांना जवळपास 9 कोटी 78 लाख रुपये नुकसान भरपाई मिळाल्याची माहिती आहे.
केंद्र सरकारने खरीप व रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेत दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता. नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांचे नुकसान झाल्यास त्या मोबदल्यात भरपाई मिळते. यंदा नगर जिल्ह्याला पावसाने जोरदार तडाखा दिला. अतिवृष्टी व सतत होणाऱ्या पावसामुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी नुकसानीची पूर्वसूचना घटना घडल्यानंतर 72 तासांच्या आत विमा कंपनीला कळविणे बंधनकारक केले होते. त्यानंतर शेतकऱ्यांनी या मुदतीत नुकसानीची माहिती विमा कंपनीला कळविली.
जिल्हाभरातून 95 हजार 92 नुकसान पूर्वसूचना विमा कंपनीला मिळाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत 80 हजार 445 आणि काढणी पश्चात 14 हजार 647 तक्रारींचा समावेश आहे. यानंतर पीक नुकसानीचे नुकसानीचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाईसाठी प्रस्ताव कंपनीला सादर करण्यात येत आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 20 हजार 226 शेतकऱ्यांनाच भरपाई मिळाली आहे. आणखीही हजारो शेतकरी भरपाई मिळण्याची वाट पाहत आहेत.
शेवगावमधून 22 हजार तक्रारी
शेवगाव तालुक्याला पावसाचा जबदस्त तडाखा बसला. या तालुक्यातून सर्वाधिक 22 हजार 123 तक्रारी आहेत. त्यापाठोपाठ नेवासा 17 हजार 742, पाथर्डी 13 हजार 715 आणि कोपरगाव तालुक्यातून 8 हजार 408 तक्रारी मिळाल्या आहेत.
शेतकऱ्यांचा राग, पालकमंत्र्यांनीही ठणकावले!
जिल्ह्यातील पीक नुकसानीची पाहणी करण्यासाठी ऐन दिवाळीत राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा जिल्हा दौरा सुरू होता. या दौऱ्यात अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीबाबत थेट मंत्री विखे यांच्याकडेच तक्रारी केल्या होत्या. त्यावर पालकमंत्री विखे पाटील यांनीही संतप्त होत विमा कंपन्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे म्हटले होते. याबाबत लवकरच कृषीमंत्र्यांबरोबर बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, बैठक झालेली नाही. बैठक कधी होणार याबाबत अद्याप काही स्पष्ट नाही.