अरुण पवार
पाटण – दोन वर्षांपूर्वी जुलै महिन्याच्या अखेरीस पाटण तालुक्यातील कोयना व मोरणा भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे गावेच्या गावे डोंगराखाली गाडली गेली. या अस्मानी संकटात अनेकांनी आपले जीव गमावले. अशा गंभीर घटनांमुळे राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामध्ये पाटण तालुक्याची नोंद झाली; परंतु आजही तालुक्यातील यंत्रणेला आपत्ती व्यवस्थापनाचे गांभीर्य समजलेले दिसत नाही. एक लॅंडलाइन फोन ठेवला, म्हणजे आपत्ती व्यवस्थापन केले, असे होत नाही. आपत्तीकाळातील निवाऱ्यासाठी केलेल्या तात्पुरत्या घरांवरून आपत्ती व्यवस्थापनाचा “फ्लॉप शो’ झाल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला असून कायमस्वरूपी उपाययोजना करा, अशी मागणी जनतेतून होत आहे.
पावसाळ्यापूर्वी प्रशासकीय पातळीवर केवळ एखादी बैठक घेऊन केलेली पूर्वतयारी म्हणजे सक्षम आपत्ती व्यवस्थापन नव्हे. अचानक अतिवृष्टी झाली, महापुर आला, पडझड व भूस्खलनासारख्या घटना घडल्या, जीवित आणि वित्त हानी झाल्यावर काही तासाने किंवा एक-दोन दिवसांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आपतग्रस्तांपर्यंत पोहोचते, हे योग्य नाही. त्यामुळे तालुक्यात आपत्तीकाळासाठी तात्पुरती नको, तर कायमस्वरूपी व शाश्वत उपाययोजना करा, अशी मागणी जोर धरू लागल्याचे दिसून येत आहे.
निसर्गापुढे कोणाचे काहीही चालत नाही. निसर्ग कोपला की होत्याचे नव्हते होते, हे पाटण तालुक्याने गेल्या दोन वर्षांपूर्वीच्या घटनांमधून अनुभवले आहे. जुलै महिन्याच्या शेवटी 2021 साली अतिवृष्टीमुळे मोरणा भागातील आंबेघर गाव रातोरात डोंगराखाली गाडले गेले. यामध्ये जवळपास तेरा जणांचा मृत्यू झाला. अशीच घटना कोयना भागातही घडली. तेथेही मनुष्यहानी झाली. यावेळी तालुक्यातील प्रशासनाने लोकांना वाचवण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले.
पण, आपत्तीच एवढी मोठी होती, की सर्व उपाययोजना अपुऱ्या ठरल्या. दरम्यान, घटनास्थळी अधिकारी पोचले. पण, उपयोग काय? लोकांना वाचवण्यासाठीची पाटण तालुक्यात आधुनिक यंत्रणा आहे कुठे? ज्यांच्यावर आपत्ती ओढवली. त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे रस्तेच बंद झाले. पुराच्या प्रवाहात डोंगर गळून पडले. अशा वेळेस हवाई यंत्रणेची गरज असते. पण, अत्याधुनिक यंत्रणा पाटण तालुक्याला मिळणे, म्हणजे एकप्रकारचे दिवास्वप्नंच पाहण्यासारखे आहे.
पावसाळा आणि त्यात जुलै महिना आला की, पाऊस पाटण तालुक्यावर आपत्तीसारखा कोसळतो. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करावा लागतो. तालुक्यातील इतर नद्या, ओढे, नाले तुडुंब वाहतात. अनेक गावांचा संपर्क तुटतो. त्यावेळेस पाटणच्या महसूल विभागाची अपुरी यंत्रणा निकामी ठरते. घटना घडल्यानंतर एनडीएआरएफची एकादी टीम बोलावली जाते. तिला मुंबई, पुणे, साताराहून यायला बराच वेळ लागतो. त्यानंतर बचावकार्यास सुरुवात.
पाटण तालुक्याला गेल्या अनेक वर्षांपासून पूर, भूकंप, दरडी कोसळणे, पुर, अतिवृष्टी अशा घटना सतत चालू आहेत. अशा घटनांचा बोध घेऊन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाटण तालुक्यासाठी ठोस व शाश्वत यंत्रणा उभी करावी, अशी मागणीही होत आहे.
पाटणला आपत्ती आली, पूर आला की, नदीकाठच्या गावांमधील नागरिकांना स्थलांतरित करावे लागते. या लोकांना कुठे शाळा, मंदिर अशा इमारतीत ठेवावे लागते. अशी वेळ पाटण तालुक्यातील लोकांवर अनेकदा आली आहे. त्यामुळे आपत्ती काळात जनतेला सर्व सोयींनी युक्त निवारा शेडची गरज भासते. ती शेड तयार करावीत, अशी माफक अपेक्षा तालुक्यातील जनतेकडून होत आहे. या मागणीचा विचार प्रशासन, लोकप्रतिनिधींनी करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आपत्ती व्यवस्थापनहसंदर्भात तालुकास्तरीय बैठक घेतली असून, गावस्तरीय समित्याही स्थापन केल्या आहेत. तालुकास्तरीय यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तालुक्याला रबरच्या दोन बोटी दिल्या आहेत. नावडी गावात एक बोट ठेवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात घोटीलमधील एक पूल खचला होता. तो दुरुस्त करण्यात आला आहे.
– रमेश पाटील (तहसीलदार, पाटण)
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्वतंत्र कार्यालय हवे
जून महिना उजाडल्यावर तालुक्यातील सर्व महसूल विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरु होते. यामध्ये अधिकाऱ्यांकडून खालच्या कर्मचाऱ्यांना नेणून दिलेले गाव न सोडण्याच्या सूचना दिल्या जातात. तर डॉक्टर व आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र कामाच्या ठिकाणी हजर राहण्याच्याही सूचना होतात. परंतु, अशा सूचनांचे कुठेही पालन होताना दिसत नाही. याची केवळ कागदोपत्रीच अंमलबजावणी होते. हे टाळण्यासाठी पाटण तालुक्याला आपत्ती व्यवस्थापन विभागाचे स्वतंत्र कार्यालय द्यावे, अशी मागणीही जनतेतून होत आहे.