मुंबई –कॉंग्रेसचा नवा अध्यक्ष कळसुत्री बाहुली नसावा. अध्यक्ष यथायोग्य पद्धतीने निवडून आलेला आणि सर्वमान्य असावा, अशी परखड भूमिका पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी मांडली. कॉंग्रेसच्या नव्या अध्यक्षांची निवड हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा धुरा स्वीकारावी, अशी बहुतांश कॉंग्रेसजनांची इच्छा आहे.
मात्र, पुन्हा अध्यक्ष बनण्यास राहुल अनुत्सुक असल्याचे समोर आले आहे. त्यातून पक्षाध्यक्षपदी गांधी परिवाराबाहेरील नेत्याची निवड होऊ शकते, अशी चिन्हे बळावली आहेत. नव्या अध्यक्षांच्या निवडीसाठी कॉंग्रेसने संघटनात्मक पातळीवरील निवडणुकीसाठीची तयारी पूर्ण केल्याचे सांगण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर, चव्हाण यांनी येथे पत्रकारांशी बोलताना अध्यक्ष निवडीविषयी भाष्य केले.
पक्षाचे कामकाज चालवण्यासाठी निवड झालेल्या अध्यक्षाला मदत करण्याची जबाबदारी काही नेत्यांवर सोपवली जावी. त्या नेत्यांची निवड पक्ष कार्यकर्त्यांनी संघटनात्मक निवडणुकांच्या माध्यमातून केलेली असावी, असे त्यांनी म्हटले. कॉंग्रेसने मागील 24 वर्षांत संघटनात्मक निवडणुका घेतलेल्या नसल्याचे म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेर दिला.
कॉंग्रेसमध्ये जैसे थे स्थिती ठेवणे पक्षहिताचे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगला पर्याय देऊन पक्षाने पुढे येण्याची गरज आहे. अन्यथा, ती ऐतिहासिक चूक ठरेल, असा इशारा चव्हाण यांनी दिला. ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद कॉंग्रेसमधून बाहेर पडल्याची घडामोड दुर्दैवी असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली. (Party needs to come forward by giving a good alternative to Prime Minister Narendra Modi – Prithviraj Chavan)