राजकारणाच्या क्षितिजावर अनेक तारे उगवतात. काही आपली चमक दाखवतात तर काही अल्पकाळातच लुप्त होतात. राजकारण हे क्षेत्र तसे सोपे नाहीच. इथे येऊन, स्वतःचे अस्तित्व निर्माण करून, ते टिकवून दाखवणे म्हणजे तारेवरची कसरत करण्यासारखे आहे. यापेक्षाही अधिक म्हणजे तुमचा मूळचा पिंड अस्सल समाजसेवकाचा असायला हवा, तेव्हा कुठे राजकीय क्षेत्रात तुमची कामे दिसून येतात. तुमचा ठसा उमटू लागतो. महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरील एक प्रसिद्ध घराणं म्हणजे पवार घराणं. वयाच्या ऐंशीव्या वर्षीही राज्याच्या राजकारणाचे चित्र स्वतःच्या बळावर बदलून दाखवणारे दिग्गज नेते आदरणीय शरद पवार साहेब, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन राजकारणात आपला ठसा उमटविणाऱ्या त्यांच्या कन्या खा. सुप्रियाताई सुळे, आपल्या सडेतोड शैलीसाठी ओळखले जाणारे धुरंदर राजकारणीआणि राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, गेल्या काही वर्षात आपल्या समंजस भूमिकेमुळे विशेषतः युवा वर्गात लोकप्रिय झालेले आ. रोहित पवार… ! ही सगळी नावं महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आदराने घेतली जातात. याच पवार घराण्यातील आणखी एक नाव सध्या चर्चेत येत आहे, ते म्हणजे पार्थ पवार.
अजित पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्याचा सुपुत्र असलेल्या पार्थ पवार यांनी राजकारणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले तेच लोकसभा निवडणुकीसाठी ! मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पार्थ यांनी खचून न जाता पुन्हा एकदा स्वतःला आजमावायचं ठरवलं आहे. युवावर्गाला त्यांचं खूप आकर्षण आहे. त्यामुळे याच युवा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ‘पार्थ पवार फाउंडेशन’ च्या माध्यमातून सामाजिक कार्याची सुरुवातही त्यांनी केली आहे. नेत्रदान शिबीर भरविणे असो कि आदिवासी पाड्यावर मोफत इंटरनेट डिव्हाइसचे वाटप असो, पार्थ यांनी हिरीरीने या सगळ्या कामात पुढाकार घेऊन सर्वसामान्य लोकांच्य मनात स्वतःचे स्थान निर्माण केलं आहे. अजित पवारांचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराप्रति पार्थ यांना असलेले प्रेम, जिव्हाळा त्यांच्या अनेक उपक्रमातून अधोरेखित होताना दिसत आहे. पार्थ यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच या उद्योगनगरीच्या विकासकामांसाठी स्वतःला वाहून घ्यायचे ठरविले आहे. पिंपरी-चिंचवड शहराचे उद्याचे ‘सार्थ’ आणि ‘यथार्थ’ कारभारी म्हणून त्यांच्याकडे पहिले जात आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेतृत्व पार्थ पवार यांच्याशी केलेली ही खास बातचीत..
१. राजकारणात दबदबा असणारे आपले आजोबा शरद पवार साहब यांचे मार्गदर्शन कसे लाभते?
- मी सर्वप्रथम स्वतःला खूप भाग्यवान समजतो कि अशा महान घराण्यात माझा जन्म झाला. माझे आजोबा आदरणीय शरद पवार साहेब यांच्याबद्दल बोलण्याइतका मी मोठा नक्कीच नाही. त्यांच्याइतकी दूरदर्शी आणि राजकारणाची समज असणारी व्यक्ती दुसरी कोणीही नाही, असे माझे प्रांजळ मत आहे. ते जितके शिस्तप्रिय आहेत, तितकेच प्रेमळही आहेत. ‘आधी पूर्ण अभ्यास करा आणि मग बोला’,असा त्यांचा कायम आग्रह असतो. आम्हा नातवंडांसमवेत जेव्हा ते वेळ घालवतात, ती वेळ आमच्यासाठी सर्वोत्तम ठरते. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते. पवार साहेब म्हणजे राजकारणाचं चालतं-बोलतं विद्यापीठच आहेत. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन नेहमीच आमच्यासाठी मोलाचं असते. राजकारणातील बदनामीची षडयंत्रे असोत की, राजकीय टीका टिप्पणी, सत्ता असो किंवा नसो, विरोधकांना धडा शिकवण्याची त्यांची मुत्सद्देगिरी, राजकारण आणि समाजकारण करत असताना सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून दूरगामी विकासाचा दृष्टिकोन अशा अनेक बाबी आजोबांकडून शिकण्यासारख्या व प्रेरणा घेण्यासारख्या आहेत.
२. वडील अजितदादा पवार यांच्याशी आपलं नातं कसं आहे?
माझे वडील अजितदादा यांचा स्वभाव वरकरणी कठोर वाटत असला तरी ते एक वडील म्हणून मला आणि माझ्या भावासाठी एक आदर्श पिता आहेत. राजकारणातील खाचा-खोचा ओळखण्याचं त्यांचं कसब वाखाणण्याजोगं आहे. त्यामुळं मला ते कायम योग्य सल्ला देतात. त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीती आहे. त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा मला नेहमीच प्रेरणा देते. सध्या तरी माझ्या आजोबा आणि वडिलांचं नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्वाचा अभ्यास करत आहे. त्यांच्या पाऊलवाटेवर चालण्याचा प्रयत्न सुरु आहे.
२. पिंपरी-चिंचवड शहराशी आपले नाते कसे जुळले?
- माझे पिंपरी-चिंचवड शहराशी खूप जवळच नाते आहे. अगदी लहानपणापासून मी इथे येत असे. या शहरात होणारे बदल मी स्वतः पाहिलेत, अनुभवले आहेत. माझे वडील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या नेतृत्वाने आणि दूरदृष्टीने पिंपरी-चिंचवड शहराचा विकास केला. त्या अर्थाने ते या उद्योगनगरीचे खरे विकासपुरुषचं. त्यांच्यासमवेत मी अनेकदा या शहरात येत असे. येथील राष्ट्रवादीच्या कट्टर निष्ठावंत नेत्यांना भेटत असे. गाव-खेडे असणाऱ्या या शहराला विकासाची आस लागलेली होती. तेव्हा या सगळ्या नेतेमंडळींच्या बैठकांना मी देखील उपस्थित राहायचो. विकासकामांसाठी त्यांची तळमळ आणि अजितदादांचे खंबीर नेतृत्व आणि मार्गदर्शन यामुळेच आज या शहराचे रूप पालटले. या सगळ्या प्रवासाचा मी काही अंशी साक्षीदार होतो, याचा मला आनंद आहे. या शहराशी म्हणूनच माझे एक जिव्हाळ्याचे, प्रेमाचे नाते आहे. या शहरासाठी खूप काही करायची इच्छा आहे.
३. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या महापालिकेतील सत्तांतराबद्दल काय सांगाल?
– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात महापालिका निवडणुकीत सत्तांतर झाल्यापासून या शहराची बकाल अवस्था कुणापासून लपली नाही. मात्र, सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे वस्त्रहरण करण्याची स्पर्धा येथील सत्ताधाऱ्यांमध्ये सुरू आहे. प्रत्येकजण सध्या जमेल तशी ही महापालिका ओरबाडतो आहे. अर्थात अपवाद म्हणून काही राजकारणी आहेत. मात्र, त्यांची संख्या खूप नगण्य आहे. त्यामुळेच २०२२ महापालिका निवडणुकीत पुन्हा एकदा विकासकामांनाच राजधर्म समजणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच सत्ता आणायची आहे.
४.पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासात राष्ट्रवादी काँग्रेसचे योगदान काय ?
– अण्णासाहेब मगर यांच्यापासून ते अजितदादा पवारांपर्यंत प्रत्येकानी या शहराच्या जडणघडण आणि नीटनेटकेपणासाठी आपले योगदान दिले. मात्र, हे करीत असताना शहरातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व आणि न्याय मिळावा म्हणून या सर्व मंडळींनी अखंड, अविरत कष्ट केले आहे. राष्ट्रवादी पक्षानेच इथल्या पारंपारिक गाववाल्यांना एकत्र करुन शहराची अस्मिता तयार केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा चेहरा सजवला तो प्रा. रामकृष्ण मोरे यांनी! प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या या शहराला बळ आणि ऊर्जा देण्याचे काम केले ते अजितदादा पवार यांनी. अजितदादा यांच्या दुरदृष्टीने शहरात पायाभूत सुविधा देतानाच शहराचे सौंदर्य राखून इतर शहरांनी आणि शहरवासीयांनी हेवा करावा, असे हे शहर बनविले. यामध्ये निगडी ते दापोडी रस्त्याचे रुंदीकरण “ग्रेड सेप्रेटर’ नदी आणि रेल्वेला ओलांडून उत्तर दक्षिण शहर जोडणारे अनेक पूल, रस्ते, झोपडपट्टी पुनर्वसन, उद्याने यासारखे शहर विस्तारीकरणात भर घालणारे प्रकल्प अजितदादा यांच्या संकल्पनेतून या शहरात उभे राहिले.
५. राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत ?
– मध्यंतरीच्या काळात भाजपच्या हाती महापालिकेची सत्ता गेल्यापासून विकासकामांचा आटलेला प्रवाह पुन्हा उर्जितावस्थेत आणण्यासाठी आम्ही निश्चितच जीवाची बाजी लावू. या शहराची दुरवस्था पाहता पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने आमचे नियोजन सुरू आहे. शहर राष्ट्रवादी पक्षाची एकजूट, सुयोग्य नियोजन, पक्षातील जुन्याजाणत्या कर्तृत्ववान मंडळींच मार्गदर्शन, नव्या दमाच्या तडफदार, होतकरू मंडळींना पक्षात घेण्याबरोबरच पक्ष संघटन करण्यावर आम्ही भर देत आहोत. मागील काळात झालेल्या चुका टाळून राज्यात जसे सत्तांतर झाले त्याच धर्तीवर आम्ही पिंपरी-चिंचवड महापालिकेतही सत्तांतर निश्चितच आणू.
६. युवावर्गाला तुमचे आकर्षण आहे. त्यांना काय संदेश द्याल?
- आजचा युवावर्ग अत्यंत जागरूक आहे. समाजात किंवा आपल्या अवती-भवती काय चालू आहे याकडे ते डोळसपणे पाहतात. ‘ट्रू स्टोरी’ आणि ‘फेक स्टोरी’ त्यांना बरोबर समजते. त्यामुळंच राजकारणातील वरवरच्या भूलथापांना या पिढीनं बळी पडू नाय, असे माझे स्पष्ट मत आहे. ‘हा सूर्य, हा जयद्रथ’ यावर विश्वास ठेवणाऱ्या या पिढीसमोर तुम्ही यथार्थ राहिले पाहिजे. तरच तुमचे प्रयत्न सार्थ होतील. आजच्या युवकांनी भरपूर शिक्षण घ्यावे. काळाच्या गरजेनुसार तंत्रज्ञानावर अधिक भर द्यावा. युवकांनी आपले कौशल्य राजकारणासारख्या क्षेत्रातही नक्कीच दाखवावे. प्रत्येक व्यक्तीला समाजाचे पांग फेडावेच लागते. यासाठी जास्तीत जास्त सामाजिक कार्य करावे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपण कोणाला निवडून देतोय, याबाबत त्यांनी निश्चितच अभ्यास करून, कामांची दखल घेऊन मतदान करावे .