पुणे – पुण्याच्या शहरी भागात असलेला खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. शिवाय, तो बारामती लोकसभा मतदारसंघात आहे. येथे तब्बल साडेपाच लाख मतदार आहेत. पण, येथून आपल्या मतदान होणार की नाही? याची शाश्वती अद्यापही राष्ट्रवादी काॅंग्रेसला येत नसल्याचे समोर आले आहे.
खडकवासला मतदारसंघात भाजपचे पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नेते अद्यापही प्रचारासाठी “घड्याळ’ हाती घेण्यास तयार नसल्याने अजित पवारांनी पार्थ पवार यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. पार्थ पवार हे मागील काही दिवसांपासून या भागात सक्रीय झाले आहेत. विशेषत: शहरी भाग असलेल्या वारजे, कोथरूड, धायरी, उत्तम नगर, कोंढवे -धावडे, कर्वेनगर, सिंहगड रस्त्याचा काही भाग, वडगाव, नांदेड सिटी या भागात हे मतदान आहे. पार्थ यांच्यावर या भागातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या माजी नगरसेवकांना सोबत घेऊन प्रचाराची जबाबदारी देण्यात आली.
मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसला या मतदारसंघात लीड मिळालेले नाही; तसेच अपेक्षित मतदानही झालेले नाही. खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. त्यामुळे २०१४ मध्ये भाजपसोबत महायुतीतून स्वत:च्या पक्षाच्या तिकिटावर लढलेल्या महादेव जानकर यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. तर, २०१९ मध्येही भाजपच्या त्यावेळच्या उमेदवार कांचन कुल यांनाही या मतदारसंघातून लीड मिळालेले आहे.
आता राष्ट्रवादी काॅंग्रेस फुटली असून, आतापर्यंत युतीत असलेली शिवसेनाही फुटलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मतांचे सर्वाधिक विभाजन झाले आहे. त्याचा फटका बसण्याची भीती अजित पवारांना आहे. या मतदारसंघातील पहिल्या मेळाव्यातच अजित पवारांनी “खडकवासला मतदारसंघातून घड्याळला मतदान होत नाही. आपल्या प्रयत्न करावे लागतील’ अशी भीती व्यक्त केली. तर स्वत: दोन दिवस अजित पवार या मतदारसंघात गाठीभेटी घेत राहिले. त्यानंतर प्रत्येक सभेत ते येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना साकडे घालत आहेत. शिवाय, “देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर झालेली चर्चा लक्षात ठेवा,’ असे सांगत आहेत.
भाजपचे पदाधिकारी नाराज ?
लोकसभा निवडणुकीनंतर पुढच्या सहा महिन्यांतच विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे आता मतदारसंघात घड्याळ पोहचविल्यास विधानसभेला अडचण होण्याची भीती या मतदारसंघातील भाजप पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी या पदाधिकाऱ्यांची समजूत घातली असली, तरी हे पदाधिकारी अद्यापही प्रचारातून दूरच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे पार्थ पवारांना या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून सक्रीय करण्यात आल्याची चर्चा आहे.