मुंबई : राज्यात करोनाचे गंभीर स्वरूप पाहायला मिळत आहे. कारण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आलेख हा वाढतच जात आहे. दरम्यान, शनिवारी २७ हजार १२६ नव्या रूग्णांचे निदान झाले. आतापर्यंतची एका दिवसातील ही उच्चांकी रुग्ण नोंद आहे. देशातही एका दिवसात ४०,९५३ नवे रुग्ण सापडले. गेल्या १११ दिवसातील हा उच्चांक आहे.
सलग तिसऱ्या दिवशी २५ हजारांहून अधिक करोना बाधितांची नोंद झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. करोनाची दुसरी लाट गंभीर ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. राज्यात गेले दोन दिवस २५ हजारहून अधिक बाधितांची नोंद झाली होती.
शनिवारी त्यात आणखी वाढ होऊन नवीन बाधितांचा आकडा २७ हजार १२६वर पोहोचला. राज्यात गेल्या २४ तासांत ९२ रूग्णांचा मृत्यू झाला, तर १४ हजार ४०० रूग्ण बरे झाले.सध्या राज्यात नऊ लाख १८ हजार ४०८ लोक गृह अलगीकरणात, तर ७,५९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
राज्यात सध्या एक लाख ९१ हजार रूग्णांवर उपचार सुरू असून रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.९७ टक्यांपर्यंत खाली आले आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २९८२ नवीन रूग्णांचे निदान झाले. नागपूरमध्ये २,८७३, पुण्यात ३२००, औरंगाबादमध्ये १०१९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये १४६८ लोकांना करोनाचा संसर्ग झाला.