पारनेर -पारनेर तालुक्यातील दरोडी येथे मुंबईवरून आलेल्या 32 वर्षीय तरुणाचा नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. त्याचा स्त्राव पुणे येथे पाठविण्यात आला असून, त्याच्या अहवालाची प्रतीक्षा पारनेरकरांना आहे. अहवालानंतरच नेमके मृत्यू मागचे कारण काय, ते कळणार आहे. मात्र या मृत्यूने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरोडी येथे शनिवारी (दि.16) एकाच कुटुंबातील चौघे जण मुंबईहून आले. त्यांना दरोडीच्या करोना ग्रामसुरक्षा समितीने विलगीकरण कक्षामध्ये ठेवले होते. मात्र या तरुणाला रविवारी (दि.17) तीनच्या सुमारास श्वास घेण्याचा त्रास जाणवू लागल्याने त्याला रांधे येथील आरोग्य केंद्रात तपासणीसाठी नेण्यात आले. तेथून त्याला नगर येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते.
मात्र उपचारादरम्यान त्याचा रविवारी सकाळी दहाच्या सुमारास मृत्यू झाला. मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे स्पष्ट झालेले नाही. त्याची करोना चाचणी घेण्यात आली. रात्री उशीरा त्याचा अहवाल निगेटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, त्या तरुणाच्या मृत्यूची बातमी धडकताच ग्रामस्थांनी गावाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत.