शिर्डी – शिर्डीत भाविकांची दिवसेंदिवस वाढणारी गर्दी व त्यात वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे शहरातील मुख्य रस्तेही अपुरे पडत आहे. शिर्डीत ठराविक हॉटेल्समध्येच पार्किंग व्यवस्था आहे तर साई संस्थांनच्या साई आश्रम व द्वारावती भक्त निवास व्यतिरिक्त कुठेही पार्किंग व्यवस्था नसल्याने गर्दीच्या वेळी खासगी वाहनातून येणाऱ्या भाविकांची पार्किंग व्यवस्था नसल्याने शेकडो वाहने नो पार्किंग झोनमध्ये रस्त्याच्या कडेला पार्क करण्याची नामुष्की येते. त्यामुळे वाहतूक नियमानुसार वाहतूक शाखेचे पोलीस ऑनलाईन दंडात्मक कारवाई करत असल्याने शेकडो भाविकांना आर्थिक नुकसानीचा त्रास सहन करावा लागतो.
साई संस्थांनची अपुरी पार्किंग व्यवस्था शिर्डी नगरपरिषदेची सुद्धा जबाबदारी आहे. त्यांची पार्किंग व्यवस्था तीस वर्षांपासून फक्त कागदावरच आहे. कारण शिर्डी विकास आराखड्यात पार्किंगचे आरक्षण आजपावेतो विकसित झाले नाही. पार्किंग आरक्षणाची जागा अजूनही भूसंपदित केली नाही, हे विशेष. राज्यातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या तीर्थस्थानी केवळ साई संस्थानच्या हलगर्जीपणामुळे भाविकांना नाहक आर्थिक दंडाला सामोरं जावं लागतं असेल तर याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
सर्वात महत्वाचे म्हणजे 180 कोटी रुपये खर्च करून साई संस्थानने अद्यावत अशा दर्शनरांगेच्या संकुलाची उभारणी केली असली तरी त्यांनाही पार्किंग सारख्या महत्वाच्या गोष्टीचा विसर पडला आहे. कारण ऐन नगर-मनमाड रस्त्यालगत असणाऱ्या दर्शनरांगेच्या संकुलात पार्किंगची व्यवस्था नाही, हे भाविकांच्या दृष्टीकोनातून दुर्दैव म्हणावं लागेल. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. साई संस्थान व शिर्डी नगरपरिषद प्रशासन पार्किंगची निर्मिती करू शकत नसेल तर आम्हाला पोलिसांकडून होणाऱ्या दंडाच्या वसुलीची भरपाई दोनही प्रशासनाने भाविकांना परत करावी, अशी मागणी पुणे येथील साईभक्त स्नेहल वर्मा यांनी केली आहे.
नो पार्किंगच्या माध्यमातून वाहतूक शाखेच्या पोलीस कारवाईत वर्षाकाठी 50 लाखांहून अधिक दंड वसूल करून पोलिस जरी पाठ थोपटून घेत असतील तरी त्यामागची भाविकांची तळतळ कुणालाच का दिसत नाही?, असा सवाल साईभक्त कुंदन पाटील यांनी केला.