पुणे – संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पुणे शहरात सोमवारी आगमन होणार असून, भक्तीमय वातावरण आणि “विठ्ठल विठ्ठल’ नामाचा गजर सोमवारी पुण्यात दुमदुमणार आहे. त्यामुळे शहरात सर्व तयारी पूर्ण झाली असून, वारकऱ्यांच्या निवासाच्या जागी स्वच्छतेची, आरोग्याची सोय महापालिकेतर्फे करण्यात आली आहे.
संत श्री तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूतून शनिवारी, तर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने रविवारी आळंदीतून प्रस्थान ठेवले.संत तुकाराम महाराजांची पिंपरी-चिंचवड येथे मुक्काम करून आणि ज्ञानेश्वर महाराजांची आजोळघरी मुक्काम करून पालख्या सोमवारी सकाळी पुण्याकडे आगेकूच करणार आहे. सोमवारी दुपारपर्यंत पालख्यांचे आणि दिंडेकऱ्यांचे, वारकऱ्यांचे पुण्यात आगमन होणार आहे. वाकडेवाडी येथे पालख्यांचे भव्य स्वागत केले जाणार आहे.
असे असेल नियोजन
वाकडेवाडी येथे पुण्याच्या हद्दीमध्ये पालख्यांनी प्रवेश केल्यानंतर महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार हे पालख्यांचे स्वागत करतील. त्यानंतर पालख्या पुढे मार्गस्थ होतील.दरवर्षीच्या नियोजित मार्गावरून, संचेती चौक, फर्गसन रस्ता, खंडोजीबाबा चौक, लकडी पूल, लक्ष्मी रस्ता मार्गे पालख्या मुक्कामस्थळी पोहोचतील.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात, तर संत तुकाराम महाराज यांची नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात मुक्कामी जातील. सोमवार आणि मंगळवारच्या मुक्कामानंतर बुधवारी दोन्ही पालख्या पुढील मुक्कामी मार्गस्थ होतील.
ठिकठिकाणी टॅंकर, फिरते शौचालय, स्वच्छता..
वारकऱ्यांची कोणतीही आबाळ होऊ नये, याची काळजी महापालिकेने घेतली आहे. ठिकठिकाणी पाण्याचे टॅंकर, शौचालये, राहण्याच्या ठिकाणी कीटकनाशक धूर फवारणी, स्वच्छता या सगळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात पालख्यांच्या मुक्काम असे पर्यंत आणि त्या पुणे हद्दीतून पुढे जाईपर्यंत ही चोख व्यवस्था असणार आहे, असे प्रशासनाने सांगितले.