– माधव विद्वांस
गेला दिस नाही येत। काही करा रे संचित। साधा आपुला रे हित। भान राखा जीवनात॥ हा जीवन संदेश देत दारी येऊन आपल्याला खर्या अर्थाने जागविणार्या वासुदेवाच्या बोलाकडे आपण नीट लक्ष देत नाही. तो बोध लक्षात घेऊन जीवनात तसे आचरण करत नाही. म्हणूनच आपल्याला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते मग जीवन कटू होते.
प्रत्येक व्यक्तीला त्याची वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदारी ही नीटनेटकेपणाने पार पाडण्यासाठी अनेक गोष्टीचे भान राखावेच लागते. मग हे भान त्याच्या आचार-विचार आणि कृतीचे असेल, जमा-खर्चाचे असेल, हक्क आणि जबाबदार्याचे असेल कोणतेही असेल; पण हे भान कायम राखून आपल्या प्रत्येक बारीक सारीक वर्तनाचा, बोलण्याचा, उद्या काय परिणाम होईल याचा विचार करून भान राखावेच लागते. माणसाने त्याच्या खाण्यापिण्याचे भान राखले नाही तर आरोग्य बिघडते.
नको ती व्यसनाधीनता मागे लागते. नाना व्याधीना आमंत्रण दिल्यासारखे होते आणि मोलाचे जीवन मातीमोल होते. माणसाने आपल्या ईश्वरदत्त वाणीचा उपयोग योग्य प्रकारे केला नाही, प्रेमाचे चार शब्द बोलून लाख मोलाची जीवा-भावाची माणसं जोडली नाहीत, मित्र आणि मैत्री टिकवण्याचा, ती वाढविण्याचा प्रसंगी त्यासाठी त्यागाचा, सहकार्याचा हात पुढे केला नाही, तर तो आपल्या कुटुंबापासून, नातेवाईकांपासून, जीवलग मित्रांपासून दुरावण्याचा, एकटा पडण्याचा धोका असतो.
आपल्या राग, लोभ, स्वार्थ, मीपणा, हेका, अहंकार, ताठा, गर्व याचे भान राखले नाही, तर त्याची समाजातील सद्गृहस्थ ही ओळख पुसली जायला वेळ लागत नाही. या सर्व संभाव्य धोक्यांचा, हानीचा, कटुतेचा, विचार करूनच प्रत्येकाने सतर्कतेने सगळ्या गोष्टीचे भान राखणे हेच हिताचे असते. हेे भान राखण्यासाठी काय करावे लागते तर सतत आपला विवेक जागा ठेवावा लागतो. भावनांच्या उद्वेगावर लक्ष ठेवावे लागते. आपल्या अपेक्षापूर्तीच्या अट्टहासाला मुरड घालावी लागते. जीवनगाणे बेसूर होणार नाही, त्याची लय मोडणार नाही याचे भान राखावे लागते.