सोलापूर (प्रतिनिधी) – मुंबई-पुण्यापेक्षाही मोठे 34 फलाट असलेले बसस्थानक पंढरपुरात (सरगम चौक) उभारण्यात आले आहे. एकाच वेळी 5 हजारांहून अधिक प्रवासी क्षमता असलेले हे बसस्थानक राज्यातील सर्वात मोठे बसस्थानक असल्याचा दावा परिवहन महामंडळाने केला आहे.
पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता कायमस्वरूपी मोठे बसस्थानक बांधण्याचा निर्णय तीन वर्षापूर्वी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. आता 23 कोटी रुपये खर्च करून एकाच वेळी 34हून अधिक बस थांबणारे बसस्थानक बांधून तयार आहे. हे बसस्थानक यंदाच्या आषाढी एकादशीदिवशी प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे.
या बसस्थानकातून पुणे, ठाणे, पालघर, रायगडसह इतर प्रमुख जिल्ह्यासाठी बसेस सोडल्या जाणार असल्याची माहिती विभागीय आगार व्यवस्थाक अजय पाटील यांनी दिली. आषाढी, कार्तिकी, माघ व चैत्री चार एकादशीसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक पंढरपूरला येत असतात. यामध्ये आषाढी एकादशीसाठी 10 लाखांहून अधिक भाविक पंढरपूरला येत असतात.
आषाढी सोहळ्यातील भाविकांसाठी 5 हजारहून अधिक बसेसची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी शहरात चार ठिकाणी बसस्थानके उभी करण्यात येतात, त्यातील हे नवीन बसस्थानक वारकऱ्यांसाठी अधिक सोईचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
5 हजार बसेस, 4 स्थानक
भीमा, चंद्रभांगेसह इतर दोन बसस्थानकावरून वारकऱ्यांना सेवा उपलब्ध करून दिली जाते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत बसेस उपलब्ध असणार आहे. यात्रा काळात चार ठिकाणी बसस्थानक असून हे सरगम चौकातील कायमस्वरूपी मोठे बसस्थानक असणार आहे.
चारही ठिकाणाहून प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र असे नियोजन करण्यात आले आहे. नवीन बसस्थानाकातून पुणे, सातारा, ठाणे, पालघर, रायगड, सातारा व सांगली या ठिकाणी बसेस सोडल्या जातील. तसेच वाहनचालकांच्या विश्रांतीसाठी 34 मोठे हॉल असून प्रवाशांना थांबण्यासाठी, फ्रेश होण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे.