रावणगाव – येथील परिसरातील परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सरकारने तातडीने पंचनामे करण्यास सुरुवात केल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या टोमॅटो, कांदा, बाजरी, हरभरा, मका, गवार, पपई, ज्वारी, ऊस आदी पिकांचे पंचनामे करण्यास दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांच्या आदेशानुसार सुरुवात करण्यात आली आहे.
गेल्या दहा-बारा दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या अवकाळी पावसामुळे शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने बाधीत क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या परिसरातील शेतकरी करीत होते.
त्यानुसार रावणगावचे ग्रामविकास अधिकारी भीमराव खोमणे, कृषी सहाय्यक अंगद शिंदे, कोतवाल छबन चव्हाण आणि कृषी मित्र विजय दिवटे यांनी शेतकऱ्यांच्या झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू केले असून बोरिबेल (ता. दौंड) येथील पिकांचे पंचनामे गावकामगार तलाठी योगिता कदम, ग्रामविकास अधिकारी रामचंद्र गोळे, कृषी सहाय्यक एकनाथ ढालपे करीत आहेत. खडकी गावात देखील शेती पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून, या गावात गावकामगार तलाठी दीपक पांढरपट्ठे, ग्रामविकास अधिकारी देवकांबळे, कृषी सहाय्यक अतुल होले हे बाधित क्षेत्राचे पंचनामे करीत आहेत.
आवश्यक कागदपत्रे आणि माहिती –
पंचनामे करताना बाधीत शेतकऱ्याच्या शेती पिकाच्या नुकसानीची विहित नमुन्यात माहिती भरून घेऊन दोन पंचांच्या समक्ष बाधित क्षेत्राचा प्रत्यक्ष पंचनामा करताना त्या माहिती फॉर्मवर शेतकऱ्याचे नाव, पिकाचे नाव, एकूण बाधित क्षेत्र, गट नंबर याबाबतची माहिती नोंदविण्यात येत असून, त्यासोबत संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे आधार कार्ड, बॅंक पासबुकची झेरॉक्स अशी कागदपत्र जोडण्याची गरज आहे.