पळशी – गेल्या पंधरा दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे माणगंगा दहा वर्षांनंतर प्रथमच दुधडी भरून वाहत आहे. येथे अनेक वेळा पूरस्थिती निर्माण झाली होती. याचा फटका कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याला बसला असून बंधाऱ्याला भगदाड पडले होते. याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर पाटबंधारे विभागाला जाग येऊन बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू झाले आहे.
माणगंगा नदीवर पळशी येथे तोरसे वस्तीनजीक पंधरा वर्षांपूर्वी तालुक्यात सर्वाधिक क्षमता असलेला कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधला होता.
हा बंधारा जाशी, पळशी व मनकर्णवाडी येथील शेतीसाठी वरदान आहे. या बंधाऱ्यात तीन किमी अंतरापर्यंत पाणीसाठा होऊ शकतो. या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी गेल्याने तटाच्या दोन्ही बाजूची माती वाहून जाऊन मोठे भगदाड पडले होते. त्यामुळे बंधारा फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. याबाबत प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्याने पाटबंधारे विभागाने दुरुस्ती सुरू केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.