पाटणा – सध्याच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीवर फार बोलत आहेत. पण त्यांच्याकडे कुठलेही घराणे नाही. तसेच नितीशकुमार हे पलटूराम आहेत, अशा शब्दांत लालूप्रसाद यादव यांनी टीका केली.
बिहारची राजधानी असलेल्या पाटणा या ठिकाणी इंडिया आघाडीच्या रॅलीमध्ये लालूप्रसाद यादव यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर कडाडून टीका केली.
लालूप्रसाद यादव म्हणाले, नितीशकुमार पहिल्यांदा एनडीएबरोबर गेले तेव्हा आम्ही त्यांना कुठलीही दुषणे किंवा शिव्या दिल्या नव्हत्या. आताही शिव्या दिल्या नाहीत. आम्ही फक्त एवढंच म्हटले होते की ते पलटूराम आहेत.
त्यामुळे त्यावेळी त्यांनी पलटी मारली होती. आम्ही दुसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण त्यांनी दुसऱ्यांदा आपण पलटूराम आहोत हेच दाखवून दिले आणि नरेंद्र मोदींच्या पायाशी जाऊन बसले, असा टोलाही त्यांनी लगाविला.
मी टीव्हीवर पाहतो कुणी फुले देतं, कुणी माळा घालतं.. हे सगळं पाहून नितीश कुमारांना लाज वाटत नाही का? ” असाही प्रश्न त्यांनी त्यांच्या भाषणात विचारला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आजकाल घराणेशाहीवर फार बोलताना दिसतात.
मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू असल्याचे वाटत नाहीत. नरेंद्र मोदींच्या आईचे निधन झाले. तरीही त्यांनी क्षौर केले नाही. हिंदू धर्मात आईचे किंवा वडिलांचे निधन झाले तर दाढी-मिशा आणि केस काढून क्षौर केले जते.
मात्र नरेंद्र मोदींनी यातले काहीही केले नाही. दुसरीकडे राम रहिमच्या देशात ते फक्त तिरस्कार पसरवण्याचे काम करत आहेत, असे म्हणत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.