S jayshankar on pakistan – पाकिस्तानमध्ये नवीन सरकार सत्तेत आल्याच्या पार्श्वभुमीवर दक्षिण आशियाई सहकार्य संघटना अर्थात सार्कचे पुनरुज्जीवन केले जाण्याची शक्यता परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी फेटाळून लावली आहे. पाकिस्तानकडून अन्य सदस्य देशांविरोधात दहशतवादाचा टूलकिट म्हणून वेगवेगळ्या मार्गांनी प्रसार केला जात असल्याने हा निर्णय घेतल्याचे जयशंकर म्हणाले. एका वार्तालापाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
सार्कमधील एक सदस्य देश सातत्याने दहशतवादाला पाठिंबा देत आहे, हीच सार्कमधील समस्या आहे, असे पाकिस्तानचा थेट उल्लेख न करता ते म्हणाले. सार्कचे पुनरुज्जीवन म्हणजे त्या संबंधित देशाबरोबरच्या व्यवहाराचाच मुद्दा आहे. कारण या देशाकडे दहशतवादाशिवाय अन्य कार्यक्रमच नाही, असे ते म्हणाले. भारत आपल्या शेजारी देशांना धाकाच ठेवू पहात आहे का, असे विचारले असता, अडचणीत असलेल्या शेजार् यांना धाकात ठेवताना ४.५ अब्ज डॉलरची मदत दिली जात नाही.
कोविड किंवा अन्य काळात औषधे आणि लसींचा पुरवठा करत नाही. अन्नधान्य, इंधन, खतांची मदत करत नाहीत. कारण जगात अन्यत्र सुरू असलेल्या युद्धांमुळे तेथील जीवनमान अडचणीचे बनलेले असते, असेही जयशंकर यांनी सांगितले.
जर गट म्हणून एकत्र येत असताना आमच्यावर हल्ला करण्याचे एखाद्या देशाचे धोरण कायम असेल, तर या गटात एकत्र असण्याचा काय फायदा असू शकतो? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सार्क हा भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश असलेला एक प्रादेशिक गट आहे.