पालघर – डहाणू तालुक्यातील चिंचणी बीचवर भरधाव कारने दहा जणांना उडवले असून यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. हेतून खातू (वय 38) असे अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने बीचवर पर्यटकांची गर्दी होती. यावेळी भरधाव कार गर्दीत घुसल्याने हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्याने बीचवर पर्यटकांची भरपूर गर्दी होती. विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावेळेस काळ्या रंगाची भरधाव कार त्या गर्दीत घुसल्याने नऊ पर्यटक जखमी झाले असून त्यात हेतून खातू या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नऊजण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत, अशी माहिती वाणगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळी यांनी दिली.
अपघातात खाद्यपदार्थांच्या गाड्यांजवळ असणाऱ्या प्लास्टिकच्या खुर्च्यांचीही मोठ्या प्रमाणात मोडतोड झाली आहे. यावरून कारचा वेग किती असेल हे समजत आहे. कार मध्ये असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या बीचवर दररोज कार व मोटरसायकलस्वार नेहमी वेगाने गाडी चालवत असतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याची मागणी बऱ्याच वर्षापासून चिंचणीकर करत आहेत. मात्र अशा भरधाव वेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही आता तरी अशांवर कारवाई करावी अशी मागणी पुढे येत आहे.