अंजली इंगवले
झुंडबळीच्या घटना आणि त्यावरील निकाल पाहिले तरी असे जाणवते की, माणुसकीला काळिमा फासणाऱ्या अशा घटनांना नेहमीच धार्मिक, जातीय वा प्रांतीय स्वरूप दिले जाते. कायद्याच्या कडक अंमलबजावणीची, न्यायाची बाजू कोणीच राखत नाही; उलटपक्षी कायद्यातून पळवाटा काढून या उन्मादाला एकप्रकारे प्रोत्साहनच दिले जाते. त्यामुळे पालघरमधील या घटनेची नोंदही खेदाने आणखी एक झुंडबळी अशीच करावी लागते.
“करोना’च्या महासंकटाशी महाराष्ट्र सरकारचा निकराचा लढा सुरू आहे. देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व यंत्रणा रात्रं-दिवस काम करत आहेत. अशी हातघाईची लढाई सुरू असतानाच मुंबईपासून अवघ्या 200 किलोमीटरवर असणाऱ्या पालघरमध्ये 16 एप्रिलच्या रात्री साधूंची आणि चालकाची एका अफवेमुळे जमावाकडून हत्या (मॉब लिंचिंग) करण्यात आली. घडलेली घटना निश्चितच निंदनीय आहे. परंतु देशपातळीवर ज्यापद्धतीने याचे चित्र उभे केले गेले. ते महाराष्ट्रासाठी अधिक चिंतेचे आहे.
पालघरमधील ज्या गडचिंचले गावात ही घटना घडली; तेथील भौगोलिक, सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी लक्षात घेणेही आवश्यक आहे. दादरा नगर हवेलीच्या सीमेवर असणारा गडचिंचले हा आदिवासीबहुल आणि अतिशय दुर्गम भाग आहे. अनेक वर्षांपासून भाजप खासदार, आमदार या भागात आपले वर्चस्व टिकवून आहेत. सध्या ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व असून येथील आमदार सीपीएमचे; तर जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. राजकीय वर्चस्वाची लढाई येथे असल्यानेच कदाचित केंद्रीय नेतृत्वाकडून, विरोधी पक्षाकडून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यात आली असावी.
पालघरमध्ये किंवा कोणत्याही ठिकाणी जमावाकडून हल्ले किवा झुंडबळी (मॉब लिंचिंग) का घडतात; याचे मुख्य कारण हे अज्ञान, अशिक्षितपणा व अंधश्रद्धेत असते. दुसरे अनामिक भीती वा राग! करोनाची भीती आणि येथील आदिवासी जनतेतील अज्ञान ही दोन्ही कारणे पालघरच्या घटनेमागे असू शकतात. चोरांची टोळी गावात आली आहे, अशी अफवा येथे पसरली होती. “लॉकडाऊन’मुळे या भागातील रस्तेही बंद आहेत. त्यामुळे रात्रीच्या वेळी संचारबंदीच्या काळात रस्त्यावरून जाणारी गाडी पोलिसांनी चौकशीसाठी थांबवली. त्यानंतर तेथे जमाव जमू लागला. जमावाकडून गाडीतील व्यक्तींवर आधी दगडफेक आणि नंतर काठ्यांनी हल्ला करण्यात आला. जमावाने केलेल्या या हल्ल्यात स्वामी कल्पवृक्ष गिरी, स्वामी सुशील गिरी या दोघा साधूंची आणि चालक निलेश तेलगडे याची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. झुंडीला कधी विचार नसतो त्याला फक्त कृती; तीही विकृती असते! हेच येथेही घडले होते.
“लॉकडाऊन’च्या काळात आपल्या गुरूंच्या अंत्यसंस्कारासाठी हे साधू मुंबईहून सुरतला चालले होते. दादरा नगर हवेलीत त्यांची गाडी अडवून परत पाठवून दिल्यानंतर त्यांनी हा आडमार्ग निवडला होता. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती देताना ही गोष्ट सांगितली. ते असेही म्हणाले की, दादरा-नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश असूनही प्रवेश नाकारण्यात आला. त्यापेक्षा रात्रभर त्यांना तेथे ठेवून त्यांनतर महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून त्यांना ताब्यात द्यायला हवे होते. ही घटना गैरसमजुतीतून घडली असून दोन धर्मातील संघर्ष नसल्याचे त्यांनी नमूद केले.
हत्येमागे मोठे षड्यंत्र असू शकते; असा दावा करून विरोधकांकडून याच्याशी नक्षली संबंध जोडण्यात आला. पण त्यात कितपत तथ्य आहे; याबद्दल शंका येते. कारण ही घटना घडण्यापूर्वी म्हणजे 15 एप्रिलला धान्य व औषधे वाटप करायला गेलेल्या एका डॉक्टर व त्याच्यासोबतच्या दोन पोलिसांनाही जमावाने असाच चोप दिला होता आणि 17 तारखेलाही जमावाने एका नागरिकाला मारहाण करून रात्रभर डांबून ठेवले होते.
यातच जुना आखाड्याच्या या दोन साधूंच्या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करून दोषींविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय संत समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून केली आहे.
हा विषय सोशल मीडियावर वाढल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी याची दखल घेत नियमितपणे अहवाल घेण्याचे आदेश दिले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. महाराष्ट्र सरकारने ज्या संयमाने ही परिस्थिती हाताळली आहे ती कौतुकास पात्र आहे. तर संकटकाळात राजकारण करू नये असे म्हणणाऱ्यांनीच ते सुरू केले आहे, याचे आश्चर्य वाटते. आर्थिक मदतीबाबत चकार शब्दही न काढणाऱ्यांनी पालघरची घटना मात्र देशपातळीवर “ब्रेकिंग न्यूज’ बनवली!
या घटनेचा तपास सीआयडीकडे सोपवत 110 आरोपींना अटक केली असून दोन पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे.
5 प्रमुख आरोपींना कारागृहात, तर 9 अल्पवयीन मुलांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आले. या कारवाईतून महाराष्ट्र सरकार, पोलीस यांच्यावर आगपाखड करणाऱ्यांना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिले आहे. या आरोपींमध्ये एकही मुस्लीम नाही; आदिवासी लोकांनी त्या दिवशी जो गलका केला त्याचा विपर्यास करून त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचेही त्यांनी सांगितले.
झुंडशाहीचे राजकारण करणारी, त्याला राजाश्रय देणारी ही सामाजिक कीड कायद्याची कडक अंमलबजावणी करून वेळीच नष्ट झाली नाही अथवा झुंडबळींच्या घटनांचा निःस्पृहपणे न्याय झाला नाही तर आणखी एक… असे म्हणत घटना घडतच राहतील.