इस्लामाबाद – अफगाणिस्तानबाबत चर्चा करण्यासाठी भारताने बोलावलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार पातळीवरील बैठकीला पाकिस्तान अनुपस्थित राहणार आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डॉ. मोईद युसुफ यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
उझबेकिस्तानबरोबरच्या सुरक्षा कराराचे कारण देऊन त्यांनी या बैठकीला अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानातील आर्थिक वृत्ताशी संबंधित एका वर्तमानपत्राने ही माहिती दिली आहे.
भारताने बोलावलेल्या या बैठकीला आपण जाणार नसल्याचे डॉ. मोईद युसुफ यांनी म्हटले आहे. तत्पूर्वी भारताने या बैठकीचे निमंत्रण दिले असल्याचे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मान्य केले होते.
भारताने या बैठकीसाठी रशिया, इराम, चीन, पाकिस्तान, ताजिकीस्तान आणि उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना निमंत्रण पाठवले होते. ही बैठक पुढील आठवड्यात होणार आहे.
अलिकडेच अफगाणिस्तानबाबत चर्चा करण्यासाठी मॉस्कोमध्ये झालेल्या बैठकीला भारताचे प्रतिनिधी उपस्थित राहिले होते. मात्र या बैठकीच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तानच्या प्रतिनिधींमध्ये अन्य कोणतीही चर्चा झाली नव्हती.