नवी दिल्ली – आंध्र प्रदेशातील वायएसआर कॉंग्रेस पक्षाने राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या तेलगु देसम पक्षाची नोंदणीच रद्द करावी, अशी मागणी आज थेट राष्ट्रपतींकडे केली आहे. वायएसआर कॉंग्रेसचे सरचिटणीस व्ही. विजय साई रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने ही मागणी केली.
तेलगु देसम पक्षाने संसदेत न्यायालयाचा अवमान केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत असा वायएसआर कॉंग्रेसचा आरोप आहे. त्यांची अनेक कृत्ये लोकप्रतिनिधी कायद्याला धरून नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. लोकांच्या मनात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी हा पक्ष खोटा प्रचार करीत असल्याचा आणि राज्याची बदनामी करीत असल्याचाही आरोप वायएसआर कॉंग्रेसचा आरोप आहे.
तेलगु देसम पक्षाचे अनेक नेते खोटे आणि पातळीसोडून आरोप करीत असून पक्षाचे प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी त्यांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न आजवर केला नसल्याचे राष्ट्रपतींना पाठवलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.