Pakistan Election Result: पाकिस्तानात 8 फेब्रुवारी रोजी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानापूर्वी लंडनमधील निर्वासन संपवून देशात परतलेले नवाझ शरीफ सहज विजयी होऊन चौथ्यांदा पाकिस्तानचे पंतप्रधान होतील, असे बोलले जात होते. नवाझ शरीफ यांना लष्कराचा मोठा पाठिंबा होता पण निवडणुकीच्या निकालांनी परिस्थिती बदलली. इम्रान खान यांच्या पक्ष पीटीआयला निवडणुकीपासून दूर ठेवण्याचा प्रत्येक प्रयत्न अयशस्वी ठरला आणि पक्षाच्या पाठिंब्याने निवडणूक लढवणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी सार्वत्रिक निवडणुकीत सर्वाधिक जागा मिळवल्या.
मात्र, पीटीआय किंवा नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाज यांना बहुमत मिळाले नाही. पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल येऊन काही दिवस उलटले आहेत, मात्र अद्याप सरकार स्थापनेबाबतचे चित्र स्पष्ट झालेले नाही.
पाकिस्तानच्या या निवडणुकीत पीटीआय (अपक्ष उमेदवार), पीएमएल (एन) आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) या तीन मोठ्या पक्षांनी भाग घेतला. पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीमध्ये एकूण 366 जागा आहेत, त्यापैकी फक्त 266 जागांवर थेट मतदान होते. 70 जागा अल्पसंख्याकांसाठी राखीव आहेत, त्यात महिलांसाठी 60 आणि बिगर मुस्लिमांसाठी 10 जागा आहेत.
सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाकडे 134 जागा असणे आवश्यक आहे. पण 2024 च्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?
पीटीआय (इमरान खान)- 93 जागा
पीएमएल (नवाज शरीफ)- 75 जागा
पीपीपी (बिलावल भुट्टो) – 54 जागा
MQM- 17 जागा
जमियत उलेमा ए इस्लाम – 4 जागा
लष्कराने ज्या प्रकारे नवाझ शरीफ यांना देशात परत आणले होते, त्यामुळे पीएमएल (एन)ला बहुमत मिळेल, अशी अपेक्षा होती. नवाज पुन्हा पाकिस्तानचे पंतप्रधान होतील आणि लष्कराच्या हातातील बाहुले बनून देश चालवतील, अशी लष्कराला आशा होती पण हे होऊ शकले नाही.
इम्रान खान यांच्या समर्थनार्थ जनतेने प्रचंड उत्साह दाखवला आणि पीटीआय सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. इम्रान खान यांच्या उमेदवारांनीही निवडणुकीदरम्यान हेराफेरीचे आरोप केले आहेत. निवडणूक आणि मतमोजणीच्या दिवशी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात मतदान केंद्रांवर हिंसाचार, मतपेट्यांची हानी आणि मतपत्रिका फाडल्याच्या घटना घडल्या.
कोणाचे सरकार स्थापन होईल?
पाकिस्तानमध्ये कोणाचे सरकार स्थापन होणार याबाबतची स्थिती सध्या स्पष्ट झालेली नाही. पाकिस्तानच्या राज्यघटनेनुसार निवडणुकीनंतर 21 दिवसांच्या आत सरकार स्थापन करणे आवश्यक आहे. तीन आठवड्यांचा हा कालावधी 29 फेब्रुवारीला संपत आहे.
पाकिस्तानमध्ये सरकार स्थापनेबाबत सध्या चित्र स्पष्ट नाही, मात्र खालीलप्रणाणे समीकरणे तयार होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे.
शाहबाज-बिलावल यांच्यातील 50=50चा फॉर्म्युला –
2022 मध्ये इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठराव गमावला तेव्हा शाहबाज शरीफ यांनी बिलावल भुट्टो यांच्या पक्ष पीपीपीसोबत आघाडी करून सरकार स्थापन केले. भुट्टो हे शाहबाज शरीफ सरकारमध्ये परराष्ट्रमंत्री होते.
बिलावल यांना 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळवून पंतप्रधान व्हायचे होते परंतु त्यांना बहुमत मिळाले नाही आणि पक्ष केवळ 54 जागांपर्यंत मर्यादित राहिला. बिलावल भुट्टो पंतप्रधानपदासाठी सौदेबाजी करत असल्याची बातमी आहे. अशा परिस्थितीत शाहबाज शरीफ आणि बिलावल भुट्टो यांनी 3-2 च्या फॉर्म्युल्यावर पंतप्रधानपदासाठी एकमत व्हावे, असे समीकरण तयार होत आहे. म्हणजे शाहबाज तीन वर्षे आणि बिलावल दोन वर्षे पंतप्रधान राहतील.
इम्रान खानवरील खटले हटाववे, त्यांनी नवाज शरीफला पाठिंबा द्यावा –
इम्रान खान यांना शेहबाज शरीफ यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराच्या शेकडो आरोपांचा सामना करावा लागला आणि ते सध्या भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणात 14 वर्षांच्या शिक्षेवर तुरुंगात आहे.
इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमध्ये तात्काळ जामीन मिळाल्याचे वृत्त आहे, त्यामुळे आघाडी सरकारसाठी आणखी एक समीकरण तयार होताना दिसत आहे. इम्रान खान पंतप्रधानपदासाठी नवाझ शरीफ यांना पाठिंबा जाहीर करू शकतात, अशीही शक्यता आहे. इम्रान खान सध्या तसे करण्यास नकार देत आहेत, परंतु त्यांची सुटका आणि खटले बंद करणे यासारख्या गोष्टी घडल्या तर हे शक्य दिसते.
तथापि, पीटीआय नेते बॅरिस्टर गौहर अली खान यांनी म्हटले आहे की, पक्ष पीएमएल-एन किंवा पीपीपीशी कोणतीही तडजोड करणार नाही. अशी युती करण्याऐवजी पीटीआय विरोधी पक्षात बसणे पसंत करेल, असे त्यांनी म्हटले आहे.
इम्रानचे अपक्ष उमेदवार फुटून नवाज शरीफ यांच्या सोबत आल्यास –
नवाझ शरीफ हे सर्व छोट्या पक्षांना एकत्र आणतील असे दुसरे समीकरण तयार होत आहे. याशिवाय पीटीआयच्या पाठिंब्याने निवडणूक जिंकलेल्या अपक्ष उमेदवारांनाही त्यांनी आपल्या गोटात घ्यावे. त्यांच्यावर दाखल झालेले खटले संपवून मंत्रीपदाचे आमिष त्यांना दिले जाईल अशी शक्यता आहे.
पीटीआय समर्थित उमेदवार वसीम कादिर यांनी विजयानंतर नवाझ शरीफ यांच्या पक्षात प्रवेश केल्यामुळे हे समीकरणही तयार होताना दिसत आहे. नवाज शरीफ ज्या पद्धतीने या दिशेने काम करत आहेत, त्यावरून हे समीकरणही शक्य वाटत आहे.
मात्र, याबाबत पीटीआयचे नेते गौहर अली खान यांनी म्हटले आहे की, इतर सर्व अपक्ष उमेदवार त्यांच्या संपर्कात आहेत आणि ते पीटीआयसोबतच राहतील.
पाकिस्तानात लष्कराला जे हवे ते होईल –
त्याचबरोबर पाकिस्तानच्या लष्कराकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. लष्कराचा पाठिंबा असूनही नवाझ शरीफ यांना बहुमत मिळाले नसले तरी पाकिस्तानात लष्कराला जे हवे ते होईल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.
पाकिस्तानात सरकार चालवणे सोपे नाही –
पाकिस्तान हा राजकीयदृष्ट्या अस्थिर देश आहे जिथे आजपर्यंत एकही पंतप्रधान पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकलेला नाही. आता कोणतेही सरकार बनले तरी सरकार आणि देश चालवणे त्यांच्यासाठी कठीण काम असेल.
सरकारसमोरील सर्वात मोठी आव्हाने –
1. कोणत्याही पक्ष/अपक्षांच्या पाठिंब्याने सरकार एकसंध ठेवण्याचे आव्हान.
2. पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे आणि तिथे गरिबी वाढत आहे. अर्थव्यवस्था डळमळीत आहे. महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांचा नेत्यांवरील विश्वास उडत चालला आहे. पाकिस्तानात बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे कोणतेही सरकार आले तरी या समस्यांवर तातडीने काम करण्याची गरज आहे.
3. निवडणूक हेराफेरीच्या आरोपांदरम्यान जागतिक स्तरावर विश्वासार्हता प्रस्थापित करण्याचे आव्हानही नवीन सरकारसमोर असेल. पाकिस्तानमध्ये मतदानाच्या दिवशी इंटरनेटवर बंदी घालण्यात आली होती आणि निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. यावर अमेरिकेने चिंता व्यक्त केली असून पाकिस्तानमध्ये निवडणुकीदरम्यान राजकीय हिंसाचार आणि इंटरनेट बंद केल्याचा अमेरिका निषेध करते.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर म्हणाले, ‘याचा निवडणूक प्रक्रियेवर नकारात्मक परिणाम झाला आहे. पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेने हस्तक्षेप करून फसवणुकीच्या दाव्यांची सखोल चौकशी करावी, अशी अमेरिकेची इच्छा आहे. आगामी काळात यावर लक्ष ठेवून आहोत.
4. नवाझ शरीफ, बिलावल भुट्टो किंवा शाहबाज शरीफ यांपैकी कोणीही पंतप्रधान झाले तर इम्रान खान यांच्या लोकप्रियतेला सामोरे जाण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असेल.