इस्लामाबाद – भारताने प्रत्यक्ष ताबारेषे नजीक शस्त्रसंधीचे उल्लंघन करून गोळीबार केला त्यात पाकिस्तानी हदीतील एक महिला ठार झाल्याचा आरोप पाकिस्तानने केला आहे. या प्रकरणी त्यांनी भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील ज्येष्ठ दुताला समन्य जारी करून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात आज बोलावून घेतले होते. तेथे त्यांच्याकडे या प्रकरणी विचारणा करण्यात आली.
भारताने हाजीपीर व संख सेक्टर मध्ये हा गोळीबार केल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मोठ्या शस्त्रास्त्रांनी भारतीय सैन्य या भागात सातत्याने हल्ले करीत आहे असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. भारताने चालू वर्षात आत्तापर्यंत 940 वेळा शस्त्रसंधींचे उल्लंघन केले असा पाकिस्तानचा आरोप आहे. पाकिस्तानने भारतीय दूताला पाचारण करण्याची या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे.
भारताने सन 2003 च्या शस्त्रसंधी कराराचा सन्मान करावा अशी सूचनाही पाकिस्तानने केली आहे. दरम्यान दोन्ही देशांच्या सीमेवरील घडामोडींच्या संबंधात संयुक्तराष्ट्रांच्या निरीक्षण गटाने लक्ष घालावे आणि त्यांना तेथे पाचारण केले जावे अशी मागणी भारताकडूनही करण्यात आली आहे.