नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यासाठी शनिवारी ५९.०६ टक्के मतदान झाले. मतदारांचा तो कौल ८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ५८ जागांसाठी रिंगणात उतरलेल्या ८८९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहे.
सहाव्या टप्प्यात देशाची राजधानी दिल्लीतील सर्व ७ आणि हरियाणातील सर्व १० जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. दिल्लीत ५४.४८ टक्के, तर हरियाणात ५८.३७ टक्के मतदारांनी त्यांचा हक्क बजावला. पश्चिम बंगालमध्ये ८ जागांसाठी सर्वांधिक ७८ टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली. झारखंडमध्ये ४ जागांसाठी ६२.७४ टक्के, तर ओडिशात ६ जागांसाठी ६० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले.
उत्तरप्रदेशातील १४ जागांसाठी ५४ टक्के, बिहारमधील ८ जागांसाठी ५३ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान नोंदले गेले. सहाव्या टप्प्यातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या मनेका गांधी, कॉंग्रेसचे तरूण नेते कन्हैया कुमार यांचा समावेश आहे. आता केवळ सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठीचे मतदान बाकी आहे. ते १ जूनला होईल.