इस्लामाबाद – भारताने प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक शस्त्रसंधीचा भंग केल्याचा कांगावा करीत पाकिस्तानने भारतीय दूतावासातील वरीष्ठ अधिकाऱ्याला समन्स जारी करून विदेश मंत्रालयात आज बोलावून घेतले होते. भारताने जनद्रोत सेक्टर मध्ये 9 जून रोजी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी हद्दीतील चार नागरीक जखमी झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे.
भारतीय जवान पाकिस्तानी हद्दीतील लोक वस्तीच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर तोफगोळे आणि स्वयंचलित शस्त्रांतून मारा करीत आहेत. भारताने यंदा आत्तापर्यंत 1296 वेळा शस्त्रसंधीचा भंग केल्याचा दावा पाकने केला आहे.
या माऱ्यात पाकिस्तानी हद्दीतील सात जण ठार झाले असून 98 नागरीक जखमी झाले आहेत असे त्यांचे म्हणणे आहे.भारताने शस्त्रसंधीचा भंग केल्याने प्रादेशिक शांतता आणि सुरक्षेला बाधा येत आहे असेही पाकचे म्हणणे आहे.
भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा मंडळाच्या ठरावाचे काटेकोर पालन करून सीमेवर शांतता कायम ठेवावी अशी सुचनाही पाक विदेश मंत्रालयाने भारतीय अधिकाऱ्याला केली आहे. भारताने वारंवार शस्त्रसंधीचा भंग चालवल्याचा निषेधही पाक विदेश मंत्रालयाने या भारतीय अधिकाऱ्याकडे नोंदवला आहे.