भारतीय सैन्याकडून दोन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान
नवी दिल्ली: भारतीय लष्कराने दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैनिक ठार झाले. याच सैनिकांचे मृतदेह मागण्यासाठी पाकिस्तानने पांढरे निशाण फडकावल्याची घटना नियंत्रण रेषेजवळ घडली आहे. जम्मू-काश्मीर येथील हाजीपूर भागात भारतीय सैन्याने दोन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले. पाकिस्तानने नियंत्रण रेषेचे उल्लंघन करत गोळीबार केला. ज्याचं चोख प्रत्युत्तर भारतीय लष्कराने दिले आणि दोन पाकिस्तानी जवानांचा खात्मा केला.
या दोन जवानांच्या मृतदेहांची मागणी करत पाकिस्तानी लष्कराने पांढरे निशाण फडकवले आणि हे दोन मृतदेह घेऊन गेले. ही घटना 11 सप्टेंबर रोजी घडली आहे. यासंदर्भातला व्हिडीओ एका वृत्त वाहिनीने ट्विट केला आहे. पाकिस्तानी सैनिकांचा दोन दिवसांपूर्वी भारतीय सैन्याने खात्मा केला. मात्र त्यांचे मृतदेह नेण्यास पाकिस्तानने सुरुवातीला नकार दिला होता. मात्र शुक्रवारी म्हणजेच 13 सप्टेंबरला पांढरे निशाण दाखवत पाकिस्तानी लष्कराने सैनिकांचे मृतदेह पाकिस्तानात नेले.
दरम्यान, कलम 370 रद्द केल्यापासून पाकिस्तान सैरभैर झाला आहे. नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघनही सुरु आहे. याआधीही पाकिस्तानी सैन्याने गोळीबार केला आहे. मात्र भारतीय लष्कराने त्यांना वारंवार प्रत्युत्तर दिले आहे. आता दोन दिवसांपूर्वी जेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले तेव्हा पुन्हा एकदा भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्यानंतर मृतदेह नेण्यासाठी पाकिस्तानने पांढरे निशाण फडकवले.