पाचगणी (प्रतिनिधी) – जगप्रसिद्ध दोन नंबरचे पठार आणि स्वच्छतेत प्रथम क्रमांकाचे शहर असलेल्या पाचगणीच्या घनकचरा प्रकल्पात वीजनिर्मितीच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन नगराध्यक्ष लक्ष्मी कऱ्हाडकर यांच्या उपस्थितीत गुरुवारी झाले.
उपनगराध्यक्ष विनोद बिरामणे, नगरसेवक नारायण बिरामणे, पृथ्वी कासुर्डे, प्रवीण बोधे, अनिल वन्ने, सुलभा लोखंडे, अपर्णा कासुर्डे, हेमा गोळे, नीता कासुर्डे, उज्ज्वला महाडिक, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, अधिकारी सुरेश मडके, कालिदास शेंडगे, गणेश कासुर्डे, दिलीप रणदिवे, रवी कांबळे उपस्थित होते.
कऱ्हाडकर म्हणाल्या, या ठिकाणी कचरा होता. घनकचरा प्रकल्पात आधी गांडुळ खत बनवले जात होते; परंतु येथील थंड हवेत गांडुळ खतावर वाईट परिणाम होत होता. त्यामुळे घनकचऱ्यापासून बायोगॅस निर्मिती आणि बायोगॅसपासून वीजनिर्मितीचा महत्त्वांकाक्षी प्रकल्प पालिकेने उभारल्याचा आनंद आहे. येथे निर्माण होणारी वीज महावितरणला विकण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी दोन कोटी रुपये खर्च आला आहे. या गुंतवणुकीची परतफेड येत्या दोन वर्षांत होईल. “स्वच्छ भारत’ पॉइंट यापुढे निसर्गाचा पॉइंट म्हणून ओळखला जाईल.
दापकेकर म्हणाले, पर्यटकांसाठी आपण शहरात “स्वच्छ भारत’ पॉइंट विकसित करत आहोत. निसर्गाशी सुसंगत पॉइंट विकसित करणे हा उद्देश आहे. या पॉइंटवरील बगीच्यासाठी पावसाचे पाणी वापरले जाणार आहे.