सातारा – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घेतली. कास व बामणोली येथील विनापरवाना करण्यात आलेली बांधकामे नियमित करावीत. त्याकरता सर्वसमावेशक नियमावली लागू करून त्या पद्धतीचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. यासंदर्भात जिल्हाधिकारी व शिवेंद्रसिंहराजे यांच्यात अर्धा तास चर्चा झाली.
या चर्चेदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित बांधकाम नियमावलीचा आराखडा तयार करण्यासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे मुदत मागितली असून लवकरच ही नियमावली जाहीर केली जाईल, असे आश्वासन दिले. कास व बामणोली क्षेत्रातील विनापरवाना बांधकाम करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांसंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले कमालीचे आग्रही आहेत. हा आग्रह त्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला होता. येथील पठारावरील कोणत्याही व्यावसायिकाने वन विभाग, सरकारी जमीन अथवा खासगी जमिनीवर अतिक्रमण केलेले नाही. पर्यटक येणार असतील आणि रोजगार निर्माण होणार असेल तर पर्यटकांना सुविधा देण्यासाठी काही बांधकामे होतील. फक्त ती विनापरवाना असतील तर याला हॉटेल व्यावसायिक जबाबदार नाहीत या भूमिकेचा शिवेंद्रसिंहराजे यांनी गुरुवारी पुनरुच्चार केला.
शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची भेट घऊन कास व बामणोली परिसरातील नोटीस प्राप्त बांधकामे नियमित करावीत, अशी त्यांनी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. या प्रश्नी डोंगरी क्षेत्रासाठी बांधकाम नियमावली काय लागू आहे आणि या प्रकरणात पर्यावरणपूरक विशेषता 1000 मीटर उंचीपेक्षा जास्त बांधकामांना कोणत्या अटी लागू होतील, याचा सविस्तर अभ्यास करून योग्य तो निर्णय दिला जाईल, अशी ग्वाही जयवंशी यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना दिली.
प्रश्न मार्गी लागावा हीच मागणी
या प्रश्नासंदर्भात राज्य शासनाकडून काही मार्गदर्शन अथवा निर्देश आवश्यक असल्यास प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातूनही हा प्रश्न सोडवण्याची तयारी आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे यांनी पत्रकारांना सांगितले. प्रशासनापुढे अरेरावी करून चालत नाही. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतात, असा टोला उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना लगावला होता. यावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, “ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत. मी माझ्या पद्धतीने काम करत आहे. कामाची पद्धत वेगळी आहे. फक्त प्रश्न सुटावा हीच आमची मागणी आहे.’