नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अयोध्येत राम मंदिराची उभारणी होत आहे. त्यामुळे न्यायालयाने अयोध्या जमीन घोटाळ्याची स्वत:हून दखल घ्यावी, अशी भूमिका कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी गुरूवारी मांडली.
राम मंदिरालगतच्या परिसरातील जमिनी घेण्याचा सपाटा भाजप नेत्यांच्या नातलगांनी आणि सरकारी अधिकाऱ्यांनी लावल्याचा आरोप होत आहे. त्याप्रकरणी चौकशी करण्याचा आदेश उत्तरप्रदेश सरकारने महसूल खात्याला दिला. मात्र, तो आदेश म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे टीकास्त्र प्रियंका यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन सोडले. राम मंदिर उभारणीसाठी देणग्या देणाऱ्या जनतेच्या श्रद्धेला भ्रष्टाचार करणारे भाजप नेते आणि अधिकारी धक्का पोहचवत आहेत.
जनतेने राम मंदिर ट्रस्टला दिलेल्या निधीपैकी 30 कोटी रूपयांचा गैरवापर झाल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित भ्रष्टाचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मौन बाळगून आहेत. ते भ्रष्टाचार करणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा सवालही प्रियंकांनी केला.