पुणे – ग्रामीण भागातील नागरिकांना मालकी हक्काच्या पुराव्याचे प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या “स्वामित्व’ योजनेमुळे नागरिकांना ताकद मिळणार आहे. नागरिकांना स्वयंरोजगार करायचा आहे. पण पैसे नाही. त्यांना याप्रॉपर्टी कार्डच्या आधारे बॅकांकडून कर्ज मिळणे सुलभ होणार आहे. आत्मनिर्भर अभियानासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल आहे. त्याचबरोबर ड्रोनद्वारे मोजणी अचूक आणि पारदर्शकपणे होत असल्याने गावांमध्ये असणारे जमिनीचे वाद मिटणार आहेत, असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
स्वामित्व योजनेंतर्गत नागरिकांना घराचे प्रॉपर्टी कार्ड ऑनलाईन देण्याचा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते.
देशातील महाराष्ट्रासह पाच राज्यातील नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या योजनेस सुरुवात झाली. यावेळी कोंढणपूर (ता.हवेली) येथील शेतकरी विश्वनाथ मुजुमले यांना ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले. यावेळी जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, भूमी अभिलेख विभागाचे उपसंचालक किशोर तवरेज, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख राजेंद्र गोळे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर तसेच महसुल व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
पंतप्रधान म्हणाले की, प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना मिळत असल्याने त्यांना आज खुप आनंद झाला असेल. ज्या घरांचे कोणतेही कायदेशीर दस्तावेज नव्हते. त्या घरांचे कायदेशीर दस्तावेज असलेले प्रॉपर्टी कार्ड त्यांना मिळणार आहे. त्यामुळे यामध्ये सरकार अथवा इतर कोणतेही लोक तुमच्या मालमत्तेमधून तुम्हाला बेदखल करणार नाहीत. गावचे लोक जमिन अथवा घर यांच्या वादामध्ये अडकले तर गावचा विकास होत नाही.
त्याचबरोबर त्या लोकांचा सुध्दा विकास होत नाही. गावात तंटे नसतील तर गाव आणि देश प्रगती करु शकतो. स्वामित्व योजनेमुळे हे वाद संपणार आहेत. घरांचे रेकॉर्ड उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना सुरक्षित जीवन जगता येईल. त्यांचा आत्मविश्वास वाढेल. गावचा विकास सुनियोजित होण्यास मदत होणार आहे, असेही मोदी म्हणाले.
कोंढणपूरच्या ग्रामस्थाशी संवाद
राज्यात ऑनलाईन प्रॉपर्टी कार्ड मिळालेले शेतकरी विश्वनाथ मुजुमले यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. मोदी म्हणाले की, तुमच्या गावामध्ये प्रॉपर्टी कार्ड देण्याच्या कामास कधी सुरुवात झाली. पारदर्शकपणे मोजणी झाली का, असे प्रश्न विचारले. यावर उत्तर देताना मुजुमले यांनी सांगितले की, मागील एक महिन्यापासून प्रॉपर्टी कार्ड देण्याचे काम सुरु आहे. अतिशय पारदर्शकपणे मोजणीची प्रक्रिया झाली. गावची लोकसंख्या वाढत असल्याने गावठाणाबाहेरसुध्दा घरे बांधून लोक रहात आहे. त्यामुळे गावठाणांची हद्द वाढविण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. यावर मोदी यांनी ही मागणी महाराष्ट्र शासनाकडे पोहोचविण्यात येईल, असे सांगितले.