नवी दिल्ली- बिहारमध्ये 30 मार्च रोजी रामनवमीच्या मिरवणुकीनंतर काही भागांत हिंसाचार झाला होता. त्या विषयावर आपले मत मांडताना एमआयएम पक्षाचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.कोणत्याही राज्यात जेव्हा हिंसाचार हातो तेव्हा त्याची जबाबदारी राज्य सरकारची असते. बिहारशरिफ येथे अल्पसंख्य समुदायाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले असून हा कारस्थानाचाच एक भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
नालंदा हा एक संवेदनशील जिल्हा असल्याची मुख्यमंत्री नितीश यांना कल्पना होती तरीही तेथे हे सगळे झाले. याचा त्यांना मुळीच पश्चाताप नाही. काल तर ते इफ्तार पार्टीत सहभागी झाले. त्यांनी टोपी घातली, शाल पांघरली. थोडीतरी सहानुभूती त्यांनी दाखवली पाहिजे.
नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव मुस्लिमांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. दंगे करून भाजपला सत्ता मिळवायची आहे तर भीती निर्माण करून नितीश यांना त्यांचे राजकारण करायचे आहे. या प्रकरणात जे पोलीस सहभागी झाले त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही, सरकार नुकसान भरपाईची घोषणा का करत नाही असे सवालही ओवेसी यांनी यावेळी विचारले आहेत.