नवी दिल्ली – कर्नाटकमधील सत्तारूढ भाजपचे नेते मोठ्या संख्येने पक्षातून बाहेर पडत आहेत. आतापर्यंत सुमारे 10 आमदारांनी राज्य सरकारवर अविश्वास दाखवत भाजपला रामराम ठोकला. त्या पक्षाची अवस्था बुडत्या जहाजासारखी झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही ते जहाज बुडण्यापासून वाचवू शकणार नाहीत, असा दावा करत कॉंग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत बाजी मारण्याचा विश्वास व्यक्त केला.
कॉंग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सुर्जेवाला आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी भाजप आणि कर्नाटक सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. कर्नाटकने आताएवढे भ्रष्ट सरकार याआधी कधीच पाहिलेले नाही. त्या सरकारविरोधात राज्यात तीव्र स्वरूपाची लाट आहे, असे त्यांनी म्हटले.
कर्नाटकात कॉंग्रेसमध्ये एकजूट असल्याचा दावाही त्यांनी केला. कॉंग्रेसला विजय मिळाल्यास मुख्यमंत्री बनण्यावरून सिद्धरामय्या आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांच्यात मोठी रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांच्या आकांक्षेमुळे प्रदेश कॉंग्रेसमध्ये गटबाजी असल्याच्या चर्चा झडत आहेत. मात्र, त्या चर्चा कॉंग्रेस नेत्यांनी फेटाळून लावल्या.
मी आणि शिवकुमार दोघेही मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहोत. पण, भाजपचा पराजय आणि कॉंग्रेसचा विजय हेच आमच्या दोघांचेही उद्दिष्ट आहे. निवडणुकीत आमच्या पक्षाने बाजी मारल्यास नवनिर्वाचित आमदार मुख्यमंत्री ठरवतील. कॉंग्रेस श्रेष्ठी त्याबाबत अंतिम निर्णय घेतील, अशी भूमिका सिद्धरामय्या यांनी मांडली. कर्नाटक निवडणुकीसाठी 10 मे या दिवशी मतदान होणार आहे. त्या निवडणुकीमुळे कर्नाटकमधील राजकीय वातावरण तापू लागले आहे.