मुंबई: येणाऱ्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडी सर्वाधिक जागा जिंकत सत्ता स्थापन करणारअसल्याचा दावा भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्याच बरोबर शिवसेनेने जागावाटप करताना जर मुख्यमंत्री पदाचा मुद्दा सोडला, तर आदित्य ठाकरेंची गत राहुल गांधी प्रमाणे होईल. त्यामुळे शिवसेनेने आपल्या मागणीवर ठाम राहावे अस देखील आंबेडकर म्हणाले आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी ” येत्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षनेतेपद वंचित बहुजन आघाडीकडे जाईल” असं विधान केलं होत. त्यावर उत्तर देताना यावर वंचित बहुजन आघाडी विरोधात नसेल, तर सत्तेत असेल असं आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीच्या ‘गॅस सिलिंडर’ निशाणीचा उल्लेख करत विधानसभा निवडणुकीत वंचितमुळे भाजपा गॅसवर असेल, असंही म्हणाले.
तसेच “काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाशी वंचित बहुजन आघाडीच्या काही कार्यकारी मंडळ सदस्यांचा सतत संपर्क होता. मात्र काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्वदेखील चर्चा करण्याच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचा वापर करून घेत असल्याचं या परिस्थितीत वारंवार स्पष्ट झालं. लोकसभा निवडणुकीवेळी आलेला अनुभव पुन्हा एकदा आम्हाला आला. काँग्रेस आघाडीसाठी उत्सुक आहे. मात्र वंचितच त्यासाठी तयार नाही, असं चित्र काँग्रेसकडून निर्माण केलं जात आहे”. त्यामुळे काँग्रेससोबत आघाडी होणार नसल्याच देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.