हैदराबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्याच्या नादात विरोधकांनी एकप्रकारे देशालाच विरोध सुरू केला आहे. देशाच्या सशक्तीकरणासाठी मोदी सरकारने आणलेल्या चांगल्या योजनांनाही ते विरोध करत आहेत, असे टीकास्त्र भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी शनिवारी सोडले.
भाजपच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचा प्रारंभ नड्डा यांच्या भाषणाने झाला. त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाची आणि त्यांच्या सरकारच्या कामगिरीची प्रशंसा केली. त्याचवेळी विरोधी पक्षांवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. भाजप गरिबांच्या सबलीकरणासाठी कार्यरत आहे.
तर, विरोधी पक्ष आपल्याच नेत्यांच्या कुटूंबांच्या भल्यासाठी झटत आहेत. ते पक्ष भ्रष्टाचार करण्यात गुंतले आहेत, असा आरोप त्यांनी केला. पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात मोदींनी देशाला सुशासन दिले. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये भरच पडताना दिसते. भाजपला एका पाठोपाठ एक निवडणुकांत, पोटनिवडणुकांत मिळणारे विजय त्याचेच द्योतक आहेत, असे नड्डा म्हणाले.
विविध राज्यांत वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर भाजपने आता दक्षिणेकडील राज्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्या रणनीतीचा भाग म्हणून त्या पक्षाने येथे बैठक आयोजित केल्याचे मानले जात आहे.