पाटणा – बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणजेच एनडीए आणि एनडीए म्हणजेच नितीश अशी स्थिती आहे, असे जेडीयूचे नेते उपेंद्र कुशवाह यांनी शनिवारी म्हटले. त्यातून त्यांनी मित्रपक्ष भाजपचे महत्व कमी दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे मानले जात आहे.
केंद्रातील सत्तारूढ आघाडीचे (एनडीए) नेतृत्व भाजपकडे आहे.
भाजप आणि नितीश यांच्या जेडीयूचा समावेश असणाऱ्या एनडीएची बिहारमध्ये सत्ता आहे. मात्र, त्या मित्रपक्षांत मागील काही काळापासून विविध मुद्द्यांवरून धुसफूस सुरू असल्याचे दिसते. अशात भाजपचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बिहारचा दौरा केला. त्यावेळी नितीश त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे प्रधान यांनी म्हटले.
त्यावर पत्रकारांनी प्रतिक्रिया विचारल्यावर नितीश यांचे सहकारी कुशवाह यांनी भाजपला डिवचणारी भूमिका मांडली. भाजप नेते काय म्हणाले ते महत्वाचे नाही. कुणीही गैरसमजात राहू नये.
बिहारमध्ये एनडीएचे अस्तित्व असेपर्यंत आघाडीचे नेतृत्व नितीश यांच्याकडेच असेल, असे त्यांनी नमूद केले. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूमध्ये सातत्याने शाब्दिक संघर्ष होतो. आता कुशवाह यांच्या वक्तव्याने तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.