कुंजीरवाडीत गावभेट दौऱ्यात तरुणाईचा मोठा प्रतिसाद
कुंजीरवाडी – ज्यांनी पाच वर्षात रुपयाचा निधी आणला नाही. ज्यांच्या बोलण्यात वास्तविकता नाही, अशा व्यक्तीला दूर करायची हीच संधी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने मतदार म्हणून तुम्हाला आहे, अशी टीका महायुतीचे शिरुर लोकसभेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी डॉ. कोल्हे यांच्यावर केली. कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे गावभेट दौऱ्यातील सभेत ते बोलत होते. तुम्हाला स्टुडीओच्या सेटवरचा खासदार पाहिजे का, लोकांमध्ये असणारा पाहिजे, हे ठरवण्याची देखील हीच वेळ आहे. असेही त्यांनी यावेळी विचारले.
आढळराव म्हणाले की, देशाचे भवितव्य ठरविणारी ही महत्वाची निवडणूक आहे. या मतदारसंघातील केंद्राच्या निधींवर उभे राहणारे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोदींना पाठबळ द्यावे लागेल, त्यासाठी खासदार म्हणून पुन्हा एकदा मला पाठबळ द्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वल्हेकर,
पीडीसीसी बँकेचे संचालक प्रदीप कंद, बाजार समिती सभापती दिलीप कालवलकर, हवेली बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, हवेली शिवसेना तालुका प्रमुख विपुल शितोले, व्हीजेएनटी सेलचे हवेली तालुका अध्यक्ष दिलीप गाडेकर आदी यावेळी उपस्थित होते. दौऱ्यादरम्यान आढळराव पाटील यांनी दादासाहेब तुपे, सचिन तुपे, सुमित तुपे यांच्या निवासस्थानी भेटी दिल्या.
१५ वर्षात अनेकदा भेट
गेल्या १५ वर्षात तुमच्या भागात आतापर्यंत कितीतरी वेळा या भागात मी आलो आहे. अनेक कामांसाठी खासदार निधी दिला आहे. त्यात रस्ते असतील अन्य प्रकल्प असतील. त्यासाठी कायम तुमच्यासाठी कार्यरत राहीलो आहे. आता तर मतदारसंघातील मोठे प्रकल्प मार्गी लावायचे आहेत. त्यासाठी लोकसभेत जाण्यासाठी तुमचे पाठबळ हवे.
शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार, शिरुर लोकसभा मतदारसंघ.