संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ
कराड – समाजातील दुर्बल, शोषित, पिडीत, दिव्यांग, वृद्ध, निराधार, विधवा, परितक्ता, घटस्फोटिता तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या घटकांच्या कल्याणासाठी भाजपा सरकार प्रयत्नशील असून, सरकार या घटकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे प्रतिपादन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी केले.
संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदान वाढ पत्रांचे वितरण ना. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. समाजातील निराधार जनतेसाठी वरदान ठरणाऱ्या संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात भरीव वाढ करावी, अशी मागणी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी शासनस्तरावर केली होती.
या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या अनुदानात 600 रुपयांवरुन 1000 रु. इतकी भरघोस वाढ केली आहे. तसेच एक अपत्य असणाऱ्या लाभार्थ्यांना 1100 रु. आणि दोन अपत्ये असणाऱ्या लाभार्थ्यांना 1200 रु. इतकी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा आधार मिळाला आहे. ही वाढ दि. 1 सप्टेंबर 2019 पासून लागू झाली असून, कराड तालुक्यातील 8900 लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.