नांदेड जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेच्या सोबत राहणारा हा मतदारसंघ आहे. यापूर्वी शिवसेनेकडून हिंगोलीचे खासदार आणि हदगाव-हिमायतनगरचे आमदार राहिलेले सुभाष वानखेडे यांनी मागील लोकसभा निवडणुकीपासून सतत उड्या मारल्या आहेत. तरीही, येथून शिवसेनेचा आमदार निवडून आला आहे. असे असले, तरी विकासाचा मोठा अनुशेष या मतदारसंघात आहे. कारण, फक्त भावनेच्या भरात मतदान केल्यानंतर काय होते, हे येथील जनतेला आता कळून चुकले असेल.
2014 मध्ये शिवसेनेच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी कॉंग्रेसचे आमदार माधवराव पाटील यांचा पराभव केला. दरम्यान, 2014च्या निवडणुकीत भाजपमध्ये गेलेले सुभाष वानखेडे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसमध्ये पोहोचले. त्यामुळे हदगाव विधानसभेच्या निवडणुकीत आता रंगत येण्याचे चित्र आहे. तर, विद्यमान आमदाराच्या नावाला आता शिवसेनेतूनच विरोध होत असून अनेकांनी दंड थोपटले आहेत. कॉंग्रेसमध्येही तशीच परिस्थिती आहे. युतीच्या वाट्यात हा मतदारसंघ शिवसेनेचा असला, तरी येथून भाजपकडून तगडे उमेदवार आहेत. त्यामुळे जागावाटपात हा मतदारसंघ कोणाकडे येतो, हे पाहणेही रंजक ठरणार आहे. शिवाय वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमचे आव्हान प्रस्थापित पक्षांपुढे आहे. कारण, या मतदारसंघात अठरापगड जाती आणि बलुतेदारांचाही मोठा समावेश आहे. त्यामुळे मुस्लिम आणि अनुसूचित जातींची आणि त्यापाठोपाठ मराठा समाजाची मतेदेखील निर्णायक ठरणार आहेत.
दरम्यान, हा विधानसभा मतदारसंघ नांदेड जिल्ह्यात असला, तरी येथील काही भाग हिंगोली लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे या मतदारसंघावर दोन्ही जिल्ह्यातील नेत्यांच्या निर्णयाचा प्रभाव पडतो. त्यामुळे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यशस्वी तोडगा काढतील, अशी अपेक्षा शिवसैनिकांना आहे. तर, कॉंग्रेसच्या उमेदवारीची सर्व सूत्रे अशोक चव्हाण यांच्या हाती आहेत. त्यामुळे उमेदवार कोण असेल येथपासून मतांची विभागणी कशी होईल, इथपर्यंत ही निवडणूक प्रचंड अटीतटीची होणार आहे.
सध्या या मतदारसंघात रस्त्याची मोठी कामे सुरू आहेत, त्यातच वर्धा नांदेड या रेल्वे मार्गाचे कामही प्रगतीवर आहे. त्यामुळे येथून पुढेतरी हा मतदारसंघ विकासाच्या प्रवाहात येईल, अशी लोकांना आशा आहे. मात्र इथल्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी काहीही प्रयत्न झालेले नाहीत. यंदा अत्यल्प पावसाने खरीप हंगाम हातचा गेल्यात जमा आहे. पीकविमा, कर्जमाफीच्या कचाट्यात इथला शेतकरी अडकलेला आहे.
मतदारसंघाच्या समस्या काय?
या मतदारसंघातून पैनगंगा, कयाधु अशा दोन मोठ्या नद्या वाहतात. मात्र, सिंचनासाठी इसापूर धरणावरच शेतकऱ्यांना अवंलबून राहावे लागत. यंदा पावसाअभावी हे धरण भरले नसल्याने आगामी काळात शेतीला पाणी कसे द्यायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. पर्यायी सिंचन व्यवस्था येथे उभारण्यात राज्यकर्त्यांना यश आलेले नाही. उद्योगधंदे तर येथे नावालाही नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. तरुणांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही. वर्षानुवर्षे हेच मुद्दे निवडणुकीत येतात, पण त्याकडे राज्यकर्ते गांभीर्याने पाहत नाहीत. उलट येथील निवडणूक जातीपातीच्या मुद्यावर भरकटत जाते आणि संपतेही.