नवी दिल्ली – अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक महत्वाच्या व्यक्तींना आमंत्रण देण्यात आले आहे. त्यात काही राजकीय नेत्यांचाही समावेश आहे आणि अनेक नेत्यांनी त्यांना या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होता येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. तर काही असेही नेते आहेत की ज्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की त्यांना निमंत्रण मिळाले तर ते नक्कीच सोहळ्यात सहभागी होतील.
तर दुसरीकडे अशीही मंडळी आहेत की ज्यांना ना निमंत्रण मिळाले आहे, ना बोलावले जाण्याची शक्यता आहे. या सगळ्यातच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा कारत यांनी या सोहळ्यात सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
अयोध्येतील राम मंदिरा प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात आमचा पक्ष सहभागी होणार नाही असे कारत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्टच सांगितले आहे. आम्ही धार्मिक श्रध्देचा आदर करतो. मात्र ते (भारतीय जनता पार्टी) एका धार्मिक कार्यक्रमाला राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. राजकीयीकरण करण्याचा प्रयत्न सुरू असून ते चुकीचे आहे. तर याबाबत बोलताना भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी म्हणाल्या की, सगळ्यांनाच आमंत्रण पाठवण्यात आले आहे. प्रभू श्रीरामाने ज्यांना बोलावले आहे तेच लोक अयोध्येतील सोहळ्यात सहभागी होतील.
दरम्यान, प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मोजक्याच पक्षांना आणि त्यांच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आले असल्याचे राम मंदिर ट्रस्टने म्हटले आहे. तसेच राजकीय पक्षांच्या सर्वोच्च नेत्यांना आमंत्रण पाठवले जाते आहे. सोहळ्याची अत्यंत वेगात तयारी सुरू आहे. या कार्यक्रमाला सहा हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू रामाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. अत्यंत महत्वाच्या व्यक्ती दाखल होणार असल्यामुळे अयोध्येतील बंदोबस्त अत्यंत चोख ठेवण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या सोहळ्याचे थेट प्रसारण टीव्हीवरून पाहता येणार आहे.
२२ जानेवारी २०२४ या दिवशी कोणाही सामान्य नागरिकाला अयोध्येतील हॉटेलमध्ये अथवा धर्मशाळेत राहता येणार नाही. ज्यांनी अगोदर बुकींग केले आहे त्यांचे बुकींग रद्द केले जावे असे निर्देश उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अगोदरच दिले आहे.