मुंबई : शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेचे सूत्र अखेर निश्चित झाले आहे. त्यानुसार दोन उपमुख्यमंत्री नेमण्याच्या अटकळ अखेर अफवाच निघाली. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीला देण्याचे निश्चित करण्यात आले असून विधानसभा अध्यक्षपद कॉंग्रेसकडे देण्यात येणार आहे.
राज्यात फक्त एकच उपमुख्यमंत्री असेल, ते पद राष्ट्रवादीला मिळेल. विधानसभेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे राहील. उद्या होणाऱ्या शपथविधी सोहोळ्यात दोन्ही कॉंग्रेसचे प्रत्येकी दोन मंत्री शपथ घेतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, या बैठकीपुर्वी उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली. या दोन नेत्यांत सत्ता वाटपाबाबत चर्चा झाली. त्यापुर्वी पवार यांनी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि केसी वेणुगोपाल यांच्याशी चर्चा केली.
याबाबात पक्षातील वरीष्ठ नेत्यांनी दिलेल्या महितीनुसार, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, किसान कॉग्रेसचे अध्यक्ष नान पटोले, पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष नितीन राऊत यांच्यासह अमित देशमुख, विश्वजित कदम, अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांची नावे मंत्री पदासाठी निश्चित करण्यात आल्याचे कॉंग्रेसच्या वरीष्ठ नेत्याने सांगितले.
कॉंग्रेसने या सरकारमधील विधानसभा अध्यक्षपदासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री यांच्या नाव अंतिम ठरल्याचे समजते. कॉंग्रेसला आघाडीत 12 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील मंत्रीपदाची नावे शरद पवार हे स्वत: ठरवणार आहेत. त्यामूळे त्याबाबत पक्षाचे कोणतेही नेते विधान करायला तयार नाहीत. मात्र, पक्षात आणि पवार कुटुंबात परतलेल्या अजित पवार लगेच पावन करून घेणार की रोहीत पवार यांना संधी देणार याबाबत उत्सुकता आहे.
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढवली. त्यात शिवसेनेला 56 तर भाजपाला 105 जागा मिळाल्या. त्यानंतर अजित पवार पक्षात बंड करून भाजपाशी हातमिळवणी केली होती. मात्र, आमदारांचा अपेक्षित पाठींबा ते मिळवू शकले नाहीत. त्यानंतर सर्वोच्च न्यायलयाने खुले मतदान घेण्याचे आदेश दिल्याने अजित पवार स्वगृही परतले. त्यामूले आपण बहुमत सिध्द करू शकत नसल्याचे लक्षात येताच फडणवीस यांनी राजीनामा दिला.